दुबई – आशिया करंडक ( #AsiaCup2022 ) स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान ( #INDvPAK ) यांच्यातील महामुकाबला काहीच वेळात सुरू होणार आहे.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीदरम्यान रोहित म्हणाला की “खरे सांगायचे तर मला नाणेफेक इतके महत्त्वाचे वाटत नाही, आम्ही येथे फक्त चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. आम्ही येथे आयपीएल खेळलो, त्यामुळे खेळपट्टी चांगली असेल अशी आशा आहे.”
पुढे रोहित म्हणाला की, दिनेश आणि ऋषभ यांच्यात आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला. ऋषभ पंत खेळत नाही. कार्तिकला संधी देण्यात आली आहे. आवेश खान तिसरा वेगवान गोलंदाज आहे. हा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळ आहे, पण क्रिकेटपटू म्हणून आम्हाला विरोधी पक्षाचा विचार करायचा नाही, ज्या चुका होत आहेत त्या सुधारायच्या आहेत.
त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आम्ही आधी गोलंदाजी केली असती, पण ते आमच्या हातात नाही. आम्ही मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू आणि पुढे काय होते ते पाहू. नसीम शाह पदार्पण करत आहे. आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरलो आहोत. गेल्या वर्षीच्या भारतीय संघात आणि या भारतीय संघात काही नवे चेहरे आहेत. या सामन्यात आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.