दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाशी दोन हात करण्याची संधी नवख्या हॉंगकॉंग संघाला मिळाली आहे. या दोन संघात आज (बुधवार) होत असलेला सामना भारतीय संघासाठी प्लेऑफमधील प्रवेशाची औपचारिकता ठरेल तर हॉंगकॉंगसाठी अनुभवी देणारा ठरणार आहे.
या स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेतून मुख्य फेरीत दाखल झालेल्या हॉंगकॉंग संघाने अपेक्षा वाढवल्या आहेत. त्यांच्या संघात खरेतर मूळचा रहिवासी खेळाडू अगदीच नावापुरता आहे. त्यात जास्त संख्येने पाकिस्तान व भारतीय वंशाचेचे खेळाडू जास्त असल्याने त्यांच्याकडे क्रिकेटची प्रगती होताना दिसत आहे. किंचित शहा, धनंजय राव, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी हे भारतीय वंशाचे खेळाडू त्यांच्या संघाकडून आयसीसीच्या सहयोगी देशांच्या स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी करत आहेत. तर, निजाकत खान हा त्यांचा कर्णधार अष्टपैलू क्रिकेटपटू असून त्याच्याच नेतृत्वाखाली त्यांच्या संघाने यंदाच्या आयसीसीच्या पात्रता स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.
त्यांच्याकडे एजाज खान, महंमद गझनफर, यासिम मुर्तझा व किंचित शहा हे अष्टपैलू आहेत. पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेला झिशान अली हा त्यांचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे. धनंजय राव, आफताब हुसेन, महंमद वाहिद व हरूण अर्शद हे त्यांचे गोलंदाज आहेत. त्यातही हरूण अर्शद सर्वात जास्त सामने खेळला असून त्याच्याच कामगिरीवर त्यांची मदार राहणार आहे.
संघात बदलाची अपेक्षा
पाकिस्तानवरील विजयानंतर आता हॉंगकॉंगशी होत असलेला सामना तुलनेने सोपा असल्यामुळे भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला तर सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुडाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यजुवेंद्र चहलच्या जागी रवीचंद्रन अश्विन किंवा रवी बिष्णोईला संधी मिळण्याचेही संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे भारतीय फलंदाजीबाबत काही प्रश्न पाकिस्तानवरील विजयानंतरही निर्माण झाले असून प्रमुख फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी सोपा समजला जात असला तरीही हॉंगकॉंगला कमी लेखून चालणार नाही. एकेकाळी नवख्या बांगलादेशनेही भारतीय संघाला 2007 सालच्या एकदिवसी सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर काढले होते. त्यामुळे या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखत प्लेऑफमध्ये पात्र होण्याची भारतीय संघाला नामी संधी आहे.