दुबई – दुबळ्या हॉंगकॉंगनेही फलंदाजीत चमक दाखवताना भारतीय संघाला चांगली लढत दिली. मात्र, भारताच्या अनुभवीसमोर त्यांचा निभाव लागला नाही व त्यांना आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी झालेला हा सामना 40 धावांनी गमवावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघही सुपर फोर गटात दाखल झाला आहे.
भारताने विजयासाठी दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कराताना हॉंगकॉंगचा डाव 20 षटकांत 5 बाद 152 असा रोखला गेला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग व आवेश खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
That’s that from our second match at the #AsiaCup2022. #TeamIndia win by 40 runs.
Scorecard – https://t.co/k9H9a0e758 #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/fIPq7vPjdz
— BCCI (@BCCI) August 31, 2022
हॉंगकॉंगच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचा कर्णधार निझाकत खान व यासिम मुर्तझा लवकर बाद झाले. त्यानंतर बाबर हयात व किंचित शहा यांनी आक्रमक फलंदाजी केली. ही जोडी खेळत असताना हॉंगकॉंग संघ भारताला तुल्यबळ लढत देईल असे वाटत होते. मात्र, बाबर 35 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 41 धावांवर तर शहा 30 धावांवर बाद झाले व सामना भारताकडे झुकला. तळात झिशान अलीने 26 तर स्कॉट मॅकॅश्नीने 16 धावांची नाबाद खेळी करत संघाचे दीडशतक फलकावर लावले. मात्र, तोपर्यंत त्यांचा पराभव निश्चित झाला होता.
सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी व त्याला विराट कोहलीने दमदार अर्धशतक फटकावत दिलेली तोलामोलाची साथ यांच्या जोरावर भारताने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 2 बाद 192 धावा उभारल्या. कोहली व सूर्यकुमारने तिसऱ्या गड्यासाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी , हॉंगकॉंगचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर कर्णधार रोहित शर्माने लोकेश राहुलसह भारताच्या डावाची सुरुवात थाटात केली. रोहित जास्त आक्रमक होता. मात्र, त्याला पुन्हा एकदा हीच आक्रमकता भोवली. 21 धावांची आश्वासक खेळी केल्यावर तो पुन्हा एकदा बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 13 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर सातत्याने टीकेचा धनी बनलेला विराट कोहली खेळपट्टीवर आला व त्याने सुरुवातीला चाचपडत खेळल्यावर त्यालाही सूर गवसला. त्याने आपल्या जुन्या खेळीची आठवण करून देणारी फलंदाजी केली व राहुलसह डाव सावरला.
राहुल मात्र टी-20 सामन्यात फलंदाजी करत आहे की कसोटीत अशा ढंगात खेळत होता. त्याची 39 चेंडूत 2 चौकारांसह 36 धावांची ही संथ खेळी त्याच्याच अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात संपुष्टात आली. यावेळी भारतीय संघ किमान दीडशतकी धावा करेल असेच चित्र होते मात्र, सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला व त्याने सामन्याला कलाटणी दिली. त्याने नवख्या हॉंगकॉंगच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला व वादळी फलंदाजी केली.
त्याने कोहलीसह संघाचे दीडशतक फलकावर लावले तसेच या जोडीने आपापली अर्धशतकेही पूर्ण केली. त्यात सूर्यकुमारने 6 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची खेळी केली. त्याने डावातील अखेरच्या षटकांत हरुण अर्शदच्या गोलंदाजीवर चार षटकार फटकावले. कोहलीने नाबाद 59 धावा करताना 44 चेंडूत 1 चौकार व 3 षटकार फटकावले. हॉंगकॉंगकडून महंमद गझनफर व आयुष शुक्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 20 षटकांत 2 बाद 192 धावा. (रोहित शर्मा 21, लोकेश राहुल 36, विराट कोहली नाबाद 59, सूर्यकुमार यादव नाबाद 68, महंमद गझनफर 1-19, आयुष शुक्ला 1-29).
हॉंगकॉंग – 20 षटकांत 5 बाद 152 धावा. (बाबर हयात 41, किंचित शहा 30, झिशान अली नाबाद 26, स्कॉट मॅकॅश्नी नाबाद 16, भुवनेश्वर कुमार 1-15, रवींद्र जडेजा 1-15).