दुबई – विराट कोहलीने तब्बल तीन वर्षानी फटकावलेले शतक व गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने केलेली कमाल कामगिरी यांच्या जोरावर भारताने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत केवळ औपचारीकता ठरलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव करत शेवट गोड केला. या स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान या सामन्यापूर्वीच संपूष्टात आले असले तरीही कोहलीचे टी-20 क्रिकेटमधील पहिलेच शतक व भुवनेश्वरला गवसलेला सूर यांमुळे हा सामना भारताने सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 111 धावाच करू शकला.
विजयासाठी तब्बल 213 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच त्यांचा सलामीवीर हजरतुल्लाह झझाई बाद झाला. या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली.
भुवनेश्वरने आपल्या 4 षटकांत 4 धावा देत पाच गडी बाद केले. त्यांच्या इब्राहिम झदरानने दमदार अर्धशतकी खेळी केली मात्र, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. त्याने 59 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 64 धावांची तर रशिद खानने 15 धावांची खेळी केल्याने त्यांना संघाचे अर्धशतक फलकावर लावता आले.
एकवेळ त्यांची स्थिती 6 बाद 21 अशी दयनिय होती.त्यानंतर झदरान व रशिद खान यांच्यासह मुजीब उर रेहमानने 18 धावा करत चमक दाखवली व संघाचे शतक फलकावर लावले. भारताकडून भुवनेश्वरने 5, दीपक हुडा, अर्शदीप सिंग आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
An all-round performance from #TeamIndia as they seal a 101-run win against Afghanistan 👏👏
Scorecard 👉 https://t.co/QklPCXU2GZ #INDvAFG #AsiaCup2022 pic.twitter.com/Oy2Nxz5Ln6
— BCCI (@BCCI) September 8, 2022
तत्पूर्वी, विराट कोहलीने फटकावलेले दमदार शतक व त्याला साथ देताना लोकेश राहुलने झळकावलेले अर्धशतक आणि ऋषभ पंतने दिलेली साथ यांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटातील अखेरच्या लढतीत 2 गडी गमावून 212 असा धावांचा डोंगर उभारला.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजी दिली. भारताच्या डावाची सुरुवात थाटात करताना सलामीवीर लोकेश राहुलने सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीच्या साथीत संघाला शतकी सलामी दिली. यंदाच्या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच शतकी सुरुवात मिळाली. राहुलने सुरुवातीला जम बसवण्यात वेळ घेतला मात्र, त्यानंतर चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक साकार केले. मात्र, त्यानंतर त्याचा संयम ढळला व तो 41 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 62 धावा काढून बाद झाला.
दरम्यान कोहलीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवने 1 षटकार मारत चांगली सुरुवात केली मात्र, बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याची चूक त्याला महागात पडली व त्याचा 6 धावांवरच त्रिफळा उडाला. यावेळी यष्टीरक्षक ऋषभ पंतला फलंदाजीत बढती देण्यात आली. त्याने कोहलीला सुरेख साथ देत संघाला द्विशतकी धावसंख्या उभारून दिली.
कोहलीने अर्धशतकानंतर खेळण्याचा गिअर बदलला व आक्रमक फलंदाजी केली. त्याने चौकार व षटकारांची आतषबाजी करत थाटात आपले शतक साकार केले. पंत 16 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावांवर नाबाद राहिला. तर कोहलीने 61 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व तब्बल 6 षटकारांची आतषबाजी करताना नाबाद 122 धावांची स्वप्नवत खेळी केली. पंतच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी अवघ्या 42 चेंडूत 87 धावांची अभेद्द भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून फरीद मलिकने 2 गडी बाद केले.
या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्माने विश्रांती घेतली व राहुलकडे कर्णधारपद सोपवले होते. तसेच रवीचंद्रन अश्विनला वगळून दिनेश कार्तिकचा संघात समावेश केला होता. तसेच यजुवेंद्र चहल व हार्दिक पंड्या यांच्या जागी अक्सर पटेल व दीपक चहरला संधी दिली.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 20 षटकांत 2 बाद 212 धावा. (लोकेश राहुल 62, विराट कोहली नाबाद 122, ऋषभ पंत नाबाद 20, फरीद मलिक 2-57).
अफगाणिस्तान – 20 षटकांत 8 बाद 101 धावा. (मुजीब उर रेहमान 18, रशिद खान 15, इब्राहिम झदरान नाबाद 64, भवनेश्वर कुमार 5-4).