जकार्ता – इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सोमवारपासून सुरु झालेल्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सलामीच्या लढतीत एक गोलची आघाडी घेऊनही अखेरच्या क्षणी केलेल्या गचाळ बचावामुळे भारतीय संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
गतविजेत्या भारतीय संघाला यावेळीही संभाव्य विजेता मानले जात आहे. पहिल्याच सामन्यात भारताच्या कार्ती सेल्वमने 9 व्या मिनिटाला गोल केला व आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संपण्यास अवघी 70 सेकंद बाकी असताना बारताचा बचाव अत्यंत कमकुवत ठरला व पाकिस्तानच्या अब्दुल राणाने ही संधी सोडली नाही व मिळालेल्या पेनल्टीवर अफलातून गोल केला व संघाला या सामन्यात पराभवाच्या खाईतून बाहेर काढत बरोबरी मिळवून दिली. कार्ती सेल्वमने मिळालेल्या पेनल्टीचा पुरेपुर लाभ घेत भारतीय संघाला आघाडी प्राप्त करुन दिली होती. मात्र, चौथ्या व अखेरच्या सत्रात भारताचा बचाव कमी पडला.
यापूर्वी गेल्या वर्षी भारतीय संघाने एशियन चॅम्पियनस् करंडक स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला होता. तसेच या आशिया स्पर्धेच्या इतिहासातही या दोन संघात भारतीय संघानेच वर्चस्व राखले असून या संघांत आजवर झालेल्या 14 सामन्यांत भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत. आता या स्पर्धेत बुधवारी भारताचा सामना जपानशी तर गुरुवारी यजमान इंडोनेशियाशी होणार आहे.