आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला व लगेचच मैदानावरील व तिसरे पंच यांच्या चुकांमुळे वादही निर्माण झाला. स्पर्धेचा सलामीचा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात झाला.
या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी केली. 2 बाद 3 ते 3 बाद 5 अशी त्यांची बिकट स्थिती होती. पहिले दोन बळी योग्य होते. मात्र, तिसरा बळी यष्टीमागे झेलबाद झाल्याचा निर्णय डीआरएसद्वारे दिला गेला व त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. या स्पर्धेसाठी परदेशी पंचांना का नियुक्त केले गेले नाही हा प्रश्न निर्माण झाला. गेली दोन वर्षे करोनामुळे परदेशी पंचांना एका देशातून अन्य देशात पंच म्हणून गेल्यावर पहिले पंधरा दिवस विलगीकरणात राहावे लागत होते तसेच सातत्याने चाचण्यांचा सामना करावा लागत होता. आता ती परिस्थिती सुधारली असून, आता तरी परदेशी पंचांनाच नियुक्त करणे गरजेचे होते.
आयसीसीच्या एलीट पॅनवरील पंचांनाच मोठ्या स्पर्धेत नियुक्त करणे गरजेचे आहे, भारतीय तसेच आशियाई पंचांची कामगिरी आपण करोनाकाळात झालेल्या तसेच आता सुरू झालेल्या आशिया स्पर्धेतही पाहात आहोत आणि त्यांचा दर्जाही समजत आहे.
अनेकदा यावर चर्चा झाल्या, टीका झाल्या. मात्र, पंचांची कामगिरी काही सुधारताना दिसत नाही. पंचांच्या परीक्षा झाल्या त्यात केवळ तीन पंच उत्तीर्ण झाले ही आपली अवस्था मग योग्य निर्णयाची अपेक्षा कशी करायची. पंचांची कामगिरी यतातथा होती हे तर उघड आहे. मात्र, श्रीलंकेच्या संघाने जी कामगिरी केली त्याला सुमार म्हणणे खरेतर सुमार या शब्दाचाही अपमान ठरेल. त्यांना फलंदाजी कशी करावी हेच आता शिकवावे लागणार का असा प्रश्न मनात येतो.
1996 सालचा श्रीलंका संघ कुठे आणि आताचा संघ कुठे. ज्या संघाने विश्वविजेतेपद मिळवले त्यांच्याकडून नव्या पिढ्यांनी काहीच बोध घेऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका काय असेल. ( Umpire Decision Controversy In The Very First Match Of Asia Cup 2022) आशिया करंडक स्पर्धेच्या या सलामीच्या सामन्याचे एकाच शब्दात वर्णन करायचे झाले तर पंचगिरी व कामगिरी टुकार असेच करावे लागेल.