नवी दिल्ली – यंदा आशिया कप या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार आहे. या स्पर्धेला जून महिन्यात सुरुवात होईल. जर ही स्पर्धा नियोजित वेळेतच पार पडली, तर या स्पर्धेसाठी बीसीसीआय आपल्या भारतीय संघाची बी टीम पाठवू शकतो. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे करण्याचे कारण म्हणजे भारतीय संघाचे व्यस्त शेड्यूल आणि कोरोना व्हायरसच्या कारणाने निर्माण करण्यात आलेली नियमावली कारणीभूत आहे.
भारतीय संघाला आयपीएलच्या चौदाव्या हंगामानंतर इंग्लंड येथील लॉर्डस मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात 18 ते 22 दरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारत इंग्लंड दौर्यात कसोटी मालिका खेळणार आहे.
टाइम्स ऑफ़ इंडियाच्या एका सूत्राने लिहिलेल्या कॉलमनुसार, “आमच्याकडे जास्त पर्याय नाहीत. आम्ही इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणार्या मालिकेची तयारी मध्येच थांबवू शकत नाही. जर आशिया कप झाला, तर भारताकडे आपली बी टीम पाठवण्या शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.”
मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलचा चौदावा हंगाम संपताच भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होईल. ज्या ठिकाणी भारतीय संघाला 14 दिवस क्वारंटाइन मध्ये रहावे लागेल. त्यानंतर न्यूझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.
मागील वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे अशिया कप स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. त्यामुळे जर यंदा आशिया कप स्पर्धेचे आयोजन केलेच, तर ते शक्यतो जून मध्ये केले जाईल. आशिया कप ही स्पर्धा टी-20 फॉरमॅट मध्ये खेळली जाईल. तसेच या आशिया क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष जय शाह आहेत. त्यामुळे यंदा ही स्पर्धा होण्याची शक्यता खूपच प्रबळ आहे.