सातारा – करोना व्हायरस संसर्गाच्या भीतीपोटी चीन सरकारने वुहान शहराची नाकेबंदी केली होती. त्यामुळे तब्बल पंधरा दिवसातून अधिक काळ तेथे अडकून पडलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील गुरूवारी खास विमानाने भारतात परतत आहे.
चीनच्या वुहान आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीचा पासपोर्ट हातात घेतलेले छायाचित्र आश्विनी यांनी व्हायरल केले असून त्या भारतात परत असल्याचा निरोपही दिला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील भारतीय उच्चायुक्तांशी सातत्याने संपर्क ठेवून अश्विनी पाटील यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू ठेवले होते. करोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीमुळे वुहान प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली व साताऱ्याच्या अश्विनी पाटील तब्बल तीन आठवडे तेथेच अडकून पडल्या. मात्र, भारतातून चीनला गेलेल्या विशेष विमानाने भारतातील नागरिक गुरूवारी माघारी परतत आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश असून अश्विनी पाटील याच ग्रुपमध्ये आहेत. बुधवारी दुपारी त्यांनी वुहान आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छायाचित्र व्हायरल केल्याने त्या भारतात येत असल्याचे स्पष्ट झाले. वुहानमधून आलेल्या सर्व नागरिकांना वैद्यकीय तपासणीतून जावे लागणार आहे. त्या तपासणीचे अहवाल सामान्य येईपर्यंत सर्वांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येते.