सामाजिक दायित्वातून मदत कार्य
कोपरगाव तालुक्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक व कार्यकर्त्यांसमवेत मिटिंग घेतली नाही. पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशातून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्कालीन यंत्रनेच्या मदतीने सामाजिक दायित्व समजून पूरग्रस्त नागरिकांना सर्वोतोपरी मदत करीत आहे, आशुतोष काळे म्हणाले.
कोपरगाव – गोदावरी नदीला आलेल्या महापूरामुळे घाबरलेल्या कोपरगावकरांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी धीर देवून पुरग्रस्तांच्या मदतीला धाव जावून सर्वतोपरी मदत केली. आपला वाढदिवस असतांनाही त्यांनी तो साजरा न करता पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीला जाणेच पसंद केले. दुसऱ्या दिवशीही आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांची त्यांच्या गावात जावून भेट घेतली.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या सर्व गावातील नागरिकांना व त्यांच्या संसारातील संसार साहित्य कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्कालीन यंत्रणेमार्फत त्या-त्या गावातील जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर आदी ठिकाणी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांना कर्मवीर काळे कारखान्याकडून चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. काळे यांनी नागरिकांची भेट घेत विचारपूस केली.
जोपर्यंत पुराचा धोका संपत नाही तोपर्यंत नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळीच वास्तव्यास राहावे. पूर परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. जोपर्यंत पूर ओसरत नाही, तोपर्यंत काळे कारखान्याच्या वतीने सर्व नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले. महत्वाचे कागदपत्रांची व आपल्या पशुधनाचीही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. चासनळी परिसरात वीज प्रवाह बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती जाणून घेतली.
पुराच्या पाण्याचा फटका मोठ्या प्रमाणात तालुक्यातील माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, चासनळी, मोर्विस, वारी, डाऊच, मायगाव देवी, सुरेगाव, राहाता तालुक्यातील शिंगवे, रस्तापूर आदी गावांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी. अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सोमवारी पावसाची पर्वा न करता काळे यांनी गोदावरी नदीच्या काठावरील सर्व गावातील तसेच कोपरगाव शहरातील स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांच्या त्यांनी समक्ष भेटी घेतल्या. सर्व प्रकारची आपत्कालीन व्यवस्था केली आहे.