मदत करण्याचे आवाहन
औंध – लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व काही बंद असताना आश्रमातील मुलांचे देखील काही प्रमाणात हाल झाले. मला बाहेर कोणत्याही कार्यक्रमांना जाता येत नव्हते त्यामुळे आश्रमास मिळणारा निधी बंद झाला होता. या परिस्थितीतून उभारण्यासाठी आश्रमास सर्वांनी मदत करावी, असे आवाहन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी यावेळी केले.
समाजसेविका अनाथांची “माय’ सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बाणेर नागरी पतसंस्थेतर्फे करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. गेली अनेक वर्षे सिंधुताई सपकाळ अनाथ मुलामुलींचा सांभाळ करीत आहेत. या त्यांच्या भरीव सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला ओह.
याबद्दल बाणेर नागरी पतसंस्था तर्फे फुलांचा गुच्छ देऊन सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार करीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सिंधुताई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाणेर नागरी पतसंस्था आपल्या पाठीशी कायम आहे, अशी ग्वाही बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे यांनी सिंधुताई सपकाळ यांना दिली.
यावेळी बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे, विजय विधाते, पांडुरंग थोरवे, दिलीप शेलार, शशिकांत दर्शने, सुदाम मुरकुटे, राजू शेडगे, डॉक्टर जोशी, इत्यादी उपस्थित होते.