मुंबई – महाविकासआघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले असून आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेही शपथ घेणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, शपथ घेण्याआधीच अशोक चव्हाण अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली आहे.
राज्यातील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यात महविकासआघाडीला यश आले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज सायंकाळी होत असून त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळाले आहे. तर मंत्रिपदासाठी कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण यांचे नावे चर्चेत आहेत. परंतु, त्याआधीच आदर्श घोटाळ्याची फाईल ईडीने पुन्हा एकदा उघडल्याने अशोक चव्हाण अडचणीत आले आहेत. कुलाब्यातील आदर्श सोसायटीमध्ये बुधवारी ईडीचे पथक पोहचले. व आदर्श सोसायटीमध्ये पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आदर्श घोटाळा 2010 मध्ये समोर आला होता.