मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. परंतु उद्घाटन होण्यापूर्वीच यावरून वाद निर्माण झाला आहे. काही विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ठाकरे गटाच्या ‘सामना’ अग्रलेखातून देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून एक पत्र शेअर केले आहे. ज्यात लिहिले आहे की, “वास्को द गामा जग प्रवासाला निघाला तेव्हा आजचे बोरु बहाद्दर संजय असते तर त्या वास्को द गामाला पण प्रभादेवीच्या गल्लीत बसून शहाणपण शिकवायला हे गेले असते किंवा त्याने बोटीला बांधलेल्या शिडाचा रंग कुठला असावा यावर निषेध पत्रक काढत बसले असते. कारण हे फक्त उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे आहेत. केवळ दुसऱ्याच्या घरातून फेकलेल्या पंगतीवरच्या पत्रावळीवरचे कावळे उपजीविका करतात.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल आज एवढा आदर व्यक्त करणारे त्यांना राष्ट्रपती होताना विरोध करीत होते. त्यामुळे हा आदर बेगडी आहे. संसदेचा हा सोहळा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती दिनी २८ मे ला होतोय. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना भारतमातेच्या महान सुपुत्राला अशा प्रकारे पंतप्रधान अभिवादन करणार, त्या क्षणी सगळ्यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे.
हे तर उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे!@rautsanjay61 @OfficeofUT@BJP4Mumbai @BJP4India #NewParliamentBuilding pic.twitter.com/iffAkJmVSo
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 26, 2023
पण काँग्रेसच्या सावरकरद्वेषाला खतपाणी घालून “उबाठा” ने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ‘उबाठा’चा हा सावरकरद्रोह आणि महाराष्ट्रद्रोह आहे याची नोंद इतिहास घेणारच. आनंदाच्या क्षणी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले. पण औचित्य भंग करायचा असे ठरलेच होते, अशा कावळ्यांचा बहिष्काराचा कर्णकर्शक आवाज सुरु झाला. देशातील जनता हे ऐकतेय. जनता सुजाण आहे.
ती निर्मितीच्या बाजूनेच उभी राहील. ती उद्ध्वस्तांच्या माकडचाळ्यांना फारसे स्थान देणार नाही. आम्हाला सामनातून अग्रलेख लिहून शहाणपणा शिकवणाऱ्यांनी एका ऐतिहासिक क्षणी तुम्ही उष्ट्या पत्रावळ्या चाटत बसा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा! शेवटी ज्याची जेवढी कुवत तेवढीच उंचीची पायरी त्याला मिळते. शिल्लक राहिलेली कावळ्यांची ‘पंगत’ तरी भविष्यात टिको एवढीच आमची प्रार्थना आहे,” असा टोला शेलार यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
काय लिहिले ‘सामना’ अग्रलेखात?
“निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पहा,” असे ‘सामना’ अग्रलेखात लिहिले आहे.