मुंबई: शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत मराठी माणसाला गाडा, आपला मॉल वाचवा हे तुमचं मिशन असल्याची टीका केली आहे.
आशिष शेलारांनी आज ट्विट करत,“दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता…पालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या? सचिन वाझेला वसुलीला कोणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कोणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले?,” अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच “फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय?,” असा प्रश्नही आशिष शेलार यांनी विचारला आहे.
फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा!@BJP4Mumbai pic.twitter.com/LmRWLM4Vjq
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 5, 2022
पुढे शेलार म्हणाले “महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले…तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उद्ध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्ष मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे…आता म्हणे पुढे चला? कुठे वसई की विरार? की आणखी त्याच्यापण पुढे”.
तसेच हे मिशन नव्हे कमिशन असा आरोप करताना आशिष शेलार म्हणाले, “कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले. बंधू’राजां’नी वेगळी चूल मांडली. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले. वाममार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले, तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच…स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय?”. नाचता येईना अंगण वाकडे, स्वत:चे अपय़श झाकायला आता पर्याय तोकडे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.