भाषेमुळे अपमान झाला असेल तर क्षमा मागतो – आशिष शेलार
मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो, असे आशिष शेलार म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन टीका करताना, आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणे म्हणजे तुझ्या बापाचे राज्य आहे का, असे म्हटले होते. त्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो.
पण सवाल आमचा जो आहे, तो स्पष्ट आहे. अफजल गुरुची बरसी मनवणारे, संविधानाचा अपमान करणारे, भारत तेरे तुकडे तुकडे म्हणणारे, शरजीलच्या समर्थनार्थ जाणारे, या सर्वांच्या मागे जो जो राजकीय पक्ष राहील, तो संविधानाच्या विरोधात उभा आहे. त्याला आम्ही खडे सवाल करत राहू, असे आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? असे आशिष शेलार म्हणाले होते. यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने टीका केल्यानंतर आशिष शेलार यांनी आज माफी मागितली.