मुंबई : राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून आपणच चांगले यश मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यात भाजपा नेते आशिष शेलार यांनी एक दिवस बहुतेक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ‘नॅनो’त मावतील एवढेच आमदार राहतील असा टोला लगावला. तर संजय राऊत जिंकलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
याविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यात “एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत असे म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणार?”, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
दरम्यान, कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर,“ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त जागा भाजपाने जिंकल्या. तर सगळ्यात ‘नॅनो’ जागा शिवसेना (उ.बा.ठा) गटाला मिळाल्या. अहंकाराचा शेवट असाच होणार! एक दिवस बहुतेक उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत ‘नॅनो’त मावतील एवढेच आमदार राहणार,” असा टोला त्यांनी लगावला. त्यालाच आज संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.
दरम्यान, राज्यातील २४८२ ग्रामपंचायती जिंकून भाजपाने राज्यात पहिला क्रमांक कायम ठेवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ८४२ ग्रामपंचायती जिंकल्याची माहिती भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली. भाजपाच्या दाव्यानुसार, भाजप आणि शिंदे गटाने मिळून ३,२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.