मुंबई : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, या मेळाव्यांमधून विरोधी गटांवर काय आणि कोणत्या प्रकारे आरोप केले जाणार याची सर्वांमध्ये चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी,“काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!, सगळा गोंधळ घालून बघा घड्याळ कसे नामानिराळे संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारतजोडो…काय तो पेंग्विन सेनेचा दसरा…शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे.” असे आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2022
“उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. त्यामध्ये कधी ते महाराष्ट्राच्या हिताचं काही बोललेच नाही. पुन्हा टोमणे सभा होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत, जे दिवसाचे १८ तास समर्पित आहेत. ते दोघेही नेहमीच विकासाबाबत विचार करतात.
दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सकल विकास कसा होईल, महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर कसा पोहचेल. हे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यातील सभांमध्ये केवळ टोमणेच दिसले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.” असे बावनकुळे म्हणाले आहेत.