नवी दिल्ली – नवे कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यसह देशभरातील अनेक खासदारांनी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना सीमेवरच अडवले आहे. यातच त्यांच्या गाझीपूर दौऱ्यावर आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
आशिष शेलार म्हणाले,’सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धत आपण का अवलंबताय? या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा? असा खोचक सवाल शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
तत्पूर्वी, शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देणार होत्या. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना सीमेवरच अडवले आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला असून त्या म्हणाल्या कि, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही इथे गडबड करायला आलोय की काय अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखण्यात आले आहे. अन्नदाता सुखी भवं असे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांशी सरकार ज्या पद्धतीने वागतेय हे अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत मागणी करतोय की यावर वेगळी चर्चा व्हावी. पण सरकार यासाठी तयार नाही.