नवी दिल्ली -लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तरप्रदेश सरकारकडून उत्तर मागवले.
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत मागील वर्षीच्या 3 ऑक्टोबरला एका वाहनाने चिरडल्याने आंदोलन करणाऱ्या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ते वाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषचे असल्याचे समोर आले. त्या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आली.
त्याचा जामीन अर्ज मागील महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांनी दाखल केली आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारकडून उत्तर मागवले. संबंधित प्रकरणातील एका साक्षीदारावर हल्ला झाल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यावरून न्यायालयाने साक्षीदारांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती.