लखनौ – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे गतवर्षी ३ ऑक्टोबरला मंत्रीपुत्र आशिष मिश्राने शेतकऱ्यांच्या मोर्चावर गाडी घातली होती. या घटनेमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मिश्रा याला गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशातच, मिश्रा याला जामीन मंजूर झाल्यावरून सपा नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, आझम खान हे राज्यात विद्यापीठे उभारल्याने कारावास भोगत आहेत, तर मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारल्यानंतर देखील जामीन मंजूर करण्यात आलाय. हाच आहे भाजपचा, ‘नवा भारत” अशी टीका केली.
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ,मिश्रा याला जामीन मंजूर करताना, ‘मृतांपैकी कोणाच्याही शरीरावर गोळ्या झाडल्याची जखमी आढळून आली नाही. या घटनेमध्ये कदाचित असेही झाले असावे की, जीप चालकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाडी पळवली व त्यामध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी देखील हिंसक आंदोलन करत गाडीतील तिघांचा खून केला आहे, याकडे डोळेझाक करता येणार नाही. असं म्हंटलं आहे.
काय म्हणाले अखिलेश यादव?
“आझम खान यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर म्हैस चोरी, कोंबडी चोरी, वह्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र शेतकऱ्यांना जीपच्या चाकाखाली चिरडणारा माणूस तुरुंगातून बाहेर आला आहे. हा आहे भाजपचा नवा भारत,”
“ज्या माणसाने तुमच्यासाठी विद्यापीठ बांधले, तुमच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढा दिला, त्याला तुरुंगात डांबण्यात आले. आणि ज्याने जीप अंगावर घालून शेतकर्यांना चिरडलं त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. जगात कुठेही शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याची घटना घडली नाही. मात्र उत्तर प्रदेशची निवडणूक असल्याने त्याला (आशिष मिश्रा याला) जामीन मिळाला असून तो बाहेर आहे.”