श्रीमंत छत्रपती दादासाहेब महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडकावर
सातारा – श्रीमंत छत्रपती दादासाहेब महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडकावर कल्याण येथील अभिनय नाट्य संस्थेच्या अशांती पर्व या एकांकिकेने नाव कोरले. तब्बल आठ बक्षिसे व मानाचा दादा महाराज करंडक व पंचवीस हजार रुपये रोख असे पुरस्कार पटकावत अशांती पर्व आपले नाणे खणखणीतपणे वाजवले. दयानंद विद्यालय मुंबई ची “तुरटी’ व नाट्यसेवा थिएटर नाशिकच्या तो ती आणि नाटक या एकांकिकांनी सांघिक पातळीवरचे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
रविवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या शानदार कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक किशोर शिंदे, सभागृह नेत्या स्मिता घोडके यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले. तीन दिवस येथील शाहू कला मंदिरमध्ये झालेल्या एकांकिका स्पर्धात मुंबई पुणे नाशिक, इचलकरंजी, मिरज कल्याण, वाशी बोरीवली येथील बावीस संघांनी भाग घेतला होता. यंदा एकांकिका स्पर्धेचे चौथे वर्ष होते.
साताऱ्याच्या सात एकांकिका येथे सादर झाल्या. मात्र सांधिक सादरीकरण, सर्वोत्कृष्ट संहिता, अभिनेत्री, नेपथ्य, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या प्रत्येक वर्गात अशांती पर्व एकांकिका अव्वल ठरली. महाभारत कालातील कौरव पांडव यांच्यातील संघर्षाचे मूळ कोण? द्रौपदी की अतिसत्तांधपणा, भार्गवी नावाची ब्राम्हणकन्या द्रौपदीला अनेक प्रश्न विचारते. या संकल्पनेवर आधारित अशांती पर्व या एकांकिकेने बाजी मारली. दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांचे दिग्दर्शन व सोनाली मगर यांचा खणखणीत अभिनय परीक्षकांच्या दृष्टीने अव्वल ठरले.
गणेश जोशी दिग्दर्शित तुरटी ही संहिता सुध्दा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. नेपथ्य व संहिता दर्जेदार सादरीकरण यामुळे तुरटीने सुध्दा चांगलाच भाव खालला. नाट्य सेवा थिएटर नाशिक यांच्याकडून रोहित जाधव दिग्दर्शित “तो ती आणि नाटक’ या नाटकाला समीक्षकांची पसंती मिळाली. स्पर्धकांना शुभेच्छा देताना स्मिता घोडके म्हणाल्या, कलाकार हा उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतो. त्यांना व्यक्त होण्यासाठी दादासाहेब महाराज करंडक एकांकिका स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ आहे. उत्तमोत्तम कलाकृती सातारकरांपर्यंत पोहचवताना खरी कला उपासना आहे.