इंदापूर (नीलकंठ मोहिते,प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापासून खंड झालेला हरी नामाचा गजर, जणू काही मानवी शरीराला भक्तीचा सुखाचा ओलावा देतोय. याच आनंदात रिंगण सोहळ्यात चाललेल्या ज्ञानोबा माउली …. ज्ञानोबा माउली’ हा गगनभेदी नाम घोष, तर पखवाज यामधून येणारा एकसंध ताल, पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा गजर करत धावणारे वारकरी आणि पताकावाले, हंडेवाल्या, तुलशिवाल्या भगिनी व विणेकरी टाळातून येणारा एकसंध आवाज, हरिनामाचा जयजयकार मेंढ्यांच्या प्रदक्षिणेने बेलवाडी(ता.इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळयांस सुरुवात झाली व मानाच्या अश्वाने क्षणाचा विलंब न लावता तब्बल पाच परिक्रमा पूर्ण करून लाखो लोकांच्या नयनांचे पारणे फेडले.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा !
अणीक मी देवा काहीं नेणें !
गायें नाचे उडे आपुलिया छंदे !
मनाच्या आनंदे आवडीने !
परंपरेनुसार बेलवाडी गावाला गोल रिंगणाचा पहिला मान यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाने गावाला बहाल केला. सणसर-गावच्या भैरवनाथ मंदिरातील मुक्काम आटपून पहाटेची महापूजा पादुकांची महापूजा गावकर्यांच्या हस्ते करण्यात आली. गुरुवार(ता ३० जून) रोजी पालखी सोहळा हरिनामाचा जयघोष करत, मानाच्या गोल रिंगणासाठी बेलवाडी येथे सकाळी ८.४२ वाजता दाखल झाला. इंदापूर – बारामती बेलवाडी कमानीजवळ गावातील श्रीराम भजनी मंडळ, रामकृष्णहरी भजनी मंडळ व गावकर्यांनी भजन म्हणत तोफांची सलामी देत पालखीचे स्वागत केले. छत्रपती शिक्षण संस्थेचे हिराबाई हरिभाऊ देसाई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करत पावल्या खेळत,पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत केले. संत तुकाराम नगर येथे गोल रिंगणस्थळी पालखी हरिनामाच्या गजरात आणली.
यावेळी गावचे सरपंच माणिकराव जामदार, उपसरपंच रामचंद्र यादव,युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अँँड. शुभम निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार,काररवान्याचे संचालक सर्जीराव जामदार,इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे,
विठ्ठल जाचक,दादासो गायकवाड,लक्ष्मणराव भिसे,शहाजी शिंदे, हनुमंत खैरे व गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
रिंगण सोहळा सुरू होण्याअगोदर मानाचा नगारा रिंगण स्थळी दाखल झाला. पालखी सोहळा सकाळी आठ वाजून २७ मिनिटांनी पालखी स्थळावर दाखल झाला.तदनंतर पालखीसमवेत पायी वारी करणारे वारकरी यांनी पखवाज वादन करण्यास सुरुवात केली.पखवाज मधून ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा आवाज आसमंत दणाणून सोडत होता.याच आवाजाच्या मिलापाने टाळ चिपळ्या एकमेकांशी संवाद करतात याचा प्रत्यय उपस्थित असणाऱ्या लाखो भक्तगणांना आला.प्रथेप्रमाणे या भागातील मेंढपाळ प्रत्येक वर्षी आपण संभाळ केलेल्या मेंढ्या घेऊन या रिंगण सोहळ्यात उपस्थिती लावत असतात.याच पद्धतीने यंदाही आपल्या मेंढ्या सह पालखी राताला व पालखीला प्रदक्षिणा करत मानाची मेंढ्यांची प्रदक्षिणा करण्यात आली.
डोक्यांवर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी वाऱ्याच्या वेगाने रिंगण सोहळ्यात प्रदक्षिणा करीत होत्या.त्यापाठोपाठ मानाचे विणेकरी यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या.झेंडेकरी धावले,पालखीच्या मुख्य विश्वास्तांच्या सोबत गावकऱ्यांनी मानाच्या अश्वांची पूजा केली.व गोल रिंगण स्थळावर आश्वा सोबत प्रदक्षिणा केली.नाम घोष व हरिनामाने रिंगण सोहळ्याला चैतन्य निर्माण झाले होते.बघता – बघता उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी वारकऱ्यांना सोबत फुगडीचे फेर धरले,बंदोबस्तासाठी उपस्थित असणाऱ्या पोलीस बंधूंनी देखील वारकऱ्यांच्या समवेत फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला.
याच विठ्ठल मंत्राच्या सान्निध्यातून जीवनात आनंद कमवायचा आहे.आपल्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी आलेला सीन घालवण्यासाठी,या चाललेल्या हरिनामा तून जनसमुदायाला समजत होते.रिंगणाचा खरा आनंद घेण्यासाठी अनेकांचे डोळे आतुरलेले होते.पालखी सोहळा सोबत चालणारे दोन अश्व रिंगण सोहळ्यात सोडण्यात आले.काही क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही अश्वांनी रिंगण सोहळ्याला पाच परिक्रमा केल्या,पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या नामघोषात रिंगण सोहळा पार पडला.
दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा बेलवाडी गावातील गावकऱ्यांनी भजनी मंडळांनी भजन गात मारुती मंदिरात आणला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी जागोजागी अन्नदान केले, दुपारची न्याहारी घेऊन पालखी सोहळयाने लासुर्णे – जंक्शन- मार्गी अंथुर्णे
येथे मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.