पुणे (मिलन म्हेत्रे) – यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी वारीत सहभागी होणार आहेतच; पण त्याचबरोबर कर्नाटकातील अंकलीहून आळंदीकडे येणाऱ्या माउलींच्या स्वारांचेही विधिवत आणि उत्साहात स्वागत होणार आहे. या अश्वांचे शुक्रवारी (10 जून) ला अंकलीहून पुण्याकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती अंकली संस्थान प्रमुख ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांनी दिली.
गेल्या 189 वर्षांच्या परंपरेनुसार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकलीतील शितोळेसरकारांकडे आळंदीच्या माउलींच्या पालखीच्या अश्वांचा मान आहे. पालखीपूर्वी 12 दिवस ज्येष्ठ शुद्ध एकादशीला म्हणजेच 10 जूनला दोन्ही अश्वांचे सकाळी 9 वाजता प्रस्थान होत असून, मिरज, पेठ नाका सातारा मार्गे हे अश्व शनिवारी (दि. 18 जून) सायंकाळी पुण्यात मुक्कामासाठी येतील. एक दिवस त्यांचा मुक्काम पुण्यातील रास्ते वाड्यात राहील आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अश्व सोमवारी (दि. 20) आळंदीकडे प्रस्थात ठेवणार आहेत.
अंकलीहून हिरा-मोती हे माउलींचे अश्व निघतेवेळी पहाटे येथील विठ्ठल मंदिरात परंपरेनुसार दिंडी निघेल, तिथे काकडा, पूजा अभिषेक झाल्यावर दिंडी राजवाड्याकडे येईल. राजवाडा प्रदक्षिणा झाल्यावर येथील कुलदैवत अंबाबाईच्या मंदिरात कळसाची, स्वाराच्या जरीपटक्याची आणि महानैवेद्याचे साहित्य असलेल्या ट्रॅक्टरची पूजा करून महानैवेद्य दाखवला जाईल. माउलींच्या घोडेस्वाराकडे यानंतर परंपरेनुसार जरीपटका सपुर्द केला जाईल आणि अश्वांची दिंडीसह ग्रामप्रदक्षिणा झाल्यावर गावाच्या वेशीवरून त्यांना निरोप दिला जाणार आहे.
11 दिवसांचा पायी प्रवास
अंकली ते आळंदी हा सुमारे 315 कि. मी.चा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो. रोज साधारण 30 कि. मी.चा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला असतो.
जरीपटका आणि गादी
स्वाराचा जरीपटका आणि माउलींच्या अश्वाची गादी या दोन्ही गोष्टी स्वारांबरोबर असतात. आळंदीला आल्यावर अश्वांसह यांची पूजा केली जाते आणि गादी अश्वावर चढवली जाते आणि मानाचा जरीपटका स्वाराकडे परिधानासाठी दिला जातो.
स्वाराचे कौशल्य
पालखी सोबत असलेल्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माउलींचा असतो. स्वारांच्या अश्वावरील तुकाराम कोळी वयाच्या 15 व्या वर्षांपासून जात असून, सलग 24 वर्षे त्यांना हा मान मिळत आहे. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते.
माऊलींच्या महानैवेद्याचा मान शितोळे सरकारांकडे
वारी काळात दुपारच्या मुक्कामाठिकाणी माउलींना आरतीनंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे असून, या महानैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून याच दिवशी निघणार आहे.