पुणे : नरवीर तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला काबीज करताना बलिदान दिले. या घटनेवरूनच ‘गड आला पण सिंह गेला’ ही म्हण मराठी भाषेत प्रचलीत झाली. तानाजी मालुसरेंची हीच ज्वलंत प्रेरणा त्यांच्या गावी ‘उमरठ’ परिसरामध्ये आजही शाबूत असल्याची प्रचिती नुकतीच आली.
उमरठ्याजवळील ‘केवनाळे’ गावात पावसामुळे शेजारच्या घराची भिंत कोसळत असताना साक्षी दाभेकर या किशोरीने शेजारच्या घरातील दोन महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी पाठीची ढाल केली. बाळ वाचले पण साक्षीने पाय गमावला. साक्षीच्या उदाहरणावरून ‘गड जिंकला पण पाय गमावला’ ही म्हण मराठी भाषेत प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटू नये.
नरवीर तानाजी मालुसरे यांचे गाव सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या पोलादपूर तालुक्यातील ‘उमरठ’ होय. पावसाळ्यामध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतात, घरांच्या भिंती कोसळतात. (रायगड जिल्ह्यातील ‘तळीये’ गावची घटना ताजी असल्याने पोलादपूर तालुक्यातील डोंगरांच्याकडेला वसलेल्या गावागावातील लोक खूप भयभीत झाले होते.)
दरम्यान उमरठ गावाशेजारच्या ‘केवनाळे’ गावात घराची भिंत पडल्याची घटना घडली. साक्षी दाभेकर ही १४ वर्षांची मुलगी याच गावची ! भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच साक्षी शेजारच्या उफाळे कुटुंबाच्या मदतीसाठी धावली. घरात उफाळे यांचा केवळ दोन महिन्यांचा नातू झोपलेला होता. साक्षी प्रसंगावधान राखून चित्त्याच्या चपळाईने बाळावर झेपावली, पाठीची ढाल करून तीने बाळाला वाचवले. परंतु भिंतीमधील दगडविटा आणि राडारोडा साक्षीच्या पाठीवर आणि पायावर कोसळला.
या घटनेत बाळ वाचले पण साक्षीचा पाय जायबंदी झाला. साक्षीवर पोलादपूर, महाडमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुखणे वाढत गेल्याने अखेर मुंबईत केईएममध्ये शस्त्रक्रिया करून तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला.
‘के अँड क्यू’ परिवाराने दाखवली संवेदनशीलता
साक्षी नारायण दाभेकर ही केवनाळे गावातील शेतमजुराची मुलगी आहे. साक्षी पोलादपूर तालुक्यातील देवळे हायस्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत असून उत्तम क्रीडापटू आहे.
साक्षीची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर, तिच्याकडे शासकीय, प्रशासकीय पातळीवर आणि खासगी व्यक्तींकडून आर्थिक मदतीचे ओघ सुरू आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पुण्याच्या के अँड क्यू परिवाराच्या उमेश कासट, लक्ष्मिकांत मुंदडा, निशित माहेश्वरी यांनी खास पुण्यावरून मुंबई येथे रुग्णालयात जाऊन साक्षीची भेट घेतली. तिच्या पायावर करण्यात आलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि साक्षीला पन्नास हजार रुपयांची मदत केली.
साक्षीला राष्ट्रीय विरता पुरस्कार द्या
वयाच्या केवळ १४ व्या वर्षी दुसऱ्या जीवाचे प्राण वाचवावे, हा विचार मनात येणे ; त्यासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता संकटात उडी घेणे आणि प्रसंगावधान राखून दुसऱ्याचा जीव वाचवणे, हे सारे कल्पनेच्या पलिकडील आहे. साक्षीच्या पराक्रमाला खरेच दाद द्यायची असेल तर तिला २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे मुलांच्या पराक्रमासाठी दिला जाणारा यंदाचा ‘राष्ट्रीय विरता पुरस्कार’ देणे गरजेचे असून महाराष्ट्र शासनाने तशी शिफारस करावी, अशी मागणी के अँड क्यू परिवाराने केली आहे.