- दिवाळीपूर्वी एक ते दीड हजार तपासण्या : आता दिवसाला सुमारे चार हजार चाचण्या
पिंपरी – शहरातील करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडूनही आता चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी रोज सुमारे एक हजार चाचण्या होत होत्या, त्या आता चार हजारांपर्यंत गेल्या आहेत.
दिवाळीमध्ये व त्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार हे अपेक्षित धरून वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली होती. दिवाळी सणाच्या अनुषंगाने शहरात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. दिवाळीच्या काळामध्ये शहरातील बाजारापेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच शहराबाहेरील व शहरातील नागरिकांचेही येणे-जाणे झाले. दिवाळीसाठी नागरिक विना मास्क फिरत होते. तसेच सामाजिक अंतर, सॅनिटायजरचा वापर आदी नियमांचे उल्लंघन झाले. त्याचा परिणाम शहरातील रुग्णसंख्येवर झाला.
शहरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक नागरिकांची करोना चाचणी झाली आहे. त्यापैकी 91 हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. दररोज सुमारे चार हजार नागरिकांची अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. त्यामुळे चाचण्याचे प्रमाणही घटले होते. संशयित व रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची संख्या कमी झाल्याने आपोआपच चाचण्या कमी होत होत्या. या कालावधीमध्ये दिवसाला शंभरहून कमी रुग्ण आढळत होते. तर दिवाळीनंतर दररोजच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या दोनशेच्या वर जात आहे. त्यामुळे प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे.
दिवाळीनंतर शहरामध्ये नवीन 2085 रुग्णांची भर पडली आहे. या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये शहरात तब्बल 32 हजार 641 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर दिवाळीपूर्वीच्या दहा दिवसांमध्ये अवघ्या 13 हजार 561 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. दिवाळीपूर्वी शहरातील दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण हे सरासरी 1000 ते 1500 होते. तर दिवाळीनंतर हे प्रमाण वाढविण्यात आले असून सद्यस्थितीत चार हजारहून अधिक नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. बाधित येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचीही चाचणी करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. त्यामध्ये आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील परिस्थिती
एकूण चाचण्या – 57 हजार 174
पॉझिटिव्ह – 3 हजार 887
बरे झालेले – 3 हजार 341
हवामान बदलाचाही परिणाम
शहरामध्ये दुपारी कडक ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण तर रात्री व पहाटे थंडी असे वातावरण आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही झाला आहे. नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून येत आहेत. असे नागरिकही करोनाची अँटीजेन चाचणी करून घेत आहेत. त्यामुळेही चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
दिवाळीनंतर चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. दिवाळीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. त्याचा परिणाम शहरातील रुग्णसंख्येवर झाला आहे. बाधित वाढल्याने त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता करोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क, सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच वारंवार हात धुणे या नियमांचे पालन करावे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.