सिडनी – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाल्यावर काही आंदोलकांनी मैदानात घुसखोरी केली. भारतीय उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियौतील एका प्रकल्पाला विरोध करण्यासाठी घुसखोरी केलेल्या आंदोलकांनी फलक फटकावून नारेबाजीही केली.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना सहाव्या षटकात दोन आंदोलक शिरले व थेट खेळपट्टीकडे गेले. या आदोलकांनी अदानींना विरोध दर्शवताना फलक हाती घेत नारेबाजी केली. ऑस्ट्रेलिया सरकारने अदानींना थांबवले पाहिजे व धोकादायक प्रकल्प हाणून पाडला पाहिजे, असे नारे त्यांनी दिले. त्यांना स्टेट बॅंक ऑफ इंडियाने देऊ केलेले जवळपास 5 हजार कोटींचे कर्जही रोखावे असे आवाहनही या आंदोलकांनी केले. त्याचवेळी स्थानिक पोलीसांनी या दोन्ही व्यक्तींना मैदानातून बाहेर काढले व पुन्हा खेळ सुरू झाला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात आंदोलकांनी केलेल्या घुसखोरीमुळे सुरक्षेचेच वाभाडे निघाल्याचे स्पष्ट दिसून आले. करोनानंतरच्या जवळपास 8 महिन्यांच्या कालखंडानंतर या सामन्यासाठी मैदानाच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता.
मात्र, दोन आंदोलक फलक घेऊन मैदानात येऊच कसे शकतात असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. बायो बबल व कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही भेदली जाते हे दिसून आल्यामुळे आयोजकांवर तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावरही टीका सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियातील पर्यावरण संवर्धकांनी अदानी समुहाच्या कोळसा खाणींना विरोध केला होता. मात्र या न्यायालयीन वादात अदानी समूहाच्या बाजूने निकाल लागला असला तरीही त्यांच्याविरोधात जनमत वाढत आहे.