नवी दिल्ली: बालाकोट येथील पाकिस्तानच्या तळावर भारतीय लष्कराने केलेल्या 26 फेब्रुवारीच्या हल्ल्याची तारीख कशी ठरवण्यात आली, त्याविषयी नवी माहिती उघड झाली आहे. या हवाई हल्ल्याची सर्व सूत्रे संभाळणारे एअर मार्शल (निवृत्त) चंद्रशेखरन हरिकुमार यांनी ही माहिती देताना सांगितले आहे की, जेव्हा बालाकोटच्या दहशतवादी तळावर सर्वाधिक संख्येने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी एकाच ठिकाणी गोळा झालेले असतील अशा वेळी हल्ला करण्याचा उद्देश होता. त्याच उद्देशाने मध्यरात्रीनंतर हल्ला करण्याचे ठरवण्यात आले होते.
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करून हे दहशतवादी तळ उद्वस्त करून टाकले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 40 जवान जैश-ए-मोहम्मदच्या भीषण हल्ल्यात ठार झाले होते. या हल्ल्याला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.या हल्ल्यासाठी 26 फेब्रुवारीची रात्र का निवडण्यात आली याविषयीची अधिक माहिती हरिकुमार यांनी दिली.
भारतीय गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज पहाटे चार वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर नमाज अदा केला जात असे. त्यामुळे तेथे खूप मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू होती. यावर भारतीय लष्कर बरेच दिवस नजर ठेवून होते. शुक्रवार, दि. 27 च्या नमाजासाठी आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी दि. 26 रोजी त्या तळावर सर्वाधिक संख्येने दहशतवादी जमले होते. पहाटेच्या नमाजापूर्वी हे दहशतवादी तीन ते चारच्या सुमारास झोपलेले असणार,याची खात्री होती.
भारतातील रात्रीचे साडेतीन म्हणजे पाकिस्तानमधील रात्रीचे तीन वाजले असताना लष्कराने जोरदार हल्ला केला आणि झोपेत असलेल्या बेसावध दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तसेच त्या रात्री पौर्णिमा असल्याने पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चंद्र क्षितिजापासून 30 अंशावर होता. यावेळेस पृथ्वीवर पडणारा चंद्राचा प्रकाश सर्वाधिक असतो. त्या रात्री पश्चिमेकडील हवामान अगदी स्वच्छ होते. त्याचा फायदा अचूक लक्ष्यवेध घेण्यासाठी झाला. भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन करीत ही कारवाई पार पाडली होती, याकडेही हरिकुमार यांनी लक्ष वेधले आहे.