माजी आमदार कर्डिलेंचा हल्लाबोल; डॉ. तनपुरेंचे संचालक लवकरच राजीनामा देणार
नगर – राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होवू नये, सभासद व कामगारांचे हित पाहून जिल्हा बॅंक व या तालुक्याचा आमदार म्हणून मी पुढाकार घेवून मदत व सहकार्य केले. 92 कोटींचे कर्ज असतांनाही हप्ते ठरवून कर्जाचे पुनर्गठण करून कारखाना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यास दिला.
पंरतू लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विखेंनी कारखाना वाऱ्यावरच सोडून दिला. तब्बल 42 कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे. बॅंक थकबाकी वसुलीसाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. पण ही थकबाकी भरण्याचे कारखाना नाव घेत नाही. याचा अर्थात केवळ लोकसभेच्या फायदासाठी कारखाना विखेंनी ताब्यात घेतला होता का? असा सवाल माजी आमदार व बॅंकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. जिल्हा बॅंकेचे तब्बल 92 कोटी थकबाकी या कारखान्याकडे होती. जिल्हा बॅंकेने या कारखान्याचा ताबा घेतला. परंतू सभासद व कामगारांचे हित पाहण्यासाठी हा कारखाना विखेंना चालविण्यास देण्याचे ठरले. कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. मी पॅनल उभे
न करता जे पॅनल विजयी होईल.त्यांना पॅनला जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विखेंचे पॅनल निवडून आले. त्यानंतर माजीमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांनी माझी भेट घेवून जिल्हा बॅंकेकडून मदत मिळावी म्हणून मागणी केली. जिल्हा बॅंकेने देखील नियम डावलून कारखान्यास मदत करण्याचा निर्णय घेतला. कर्जाचे पुनर्गठण करून कर्जाचे दहा हप्ते केले. गेल्या दोन वर्षात कारखान्याने केवळ 13 कोटी रुपये जमा केले. तसे पाहता 23 कोटी जमा होणे आवश्यक आहे. आता कारखाना बंद आहे. त्यामुळे या वर्षांची 21 कोटी थकबाकी अशी मिळून आता ही थकबाकी 42 कोटी झाली आहे. ही थकबाकी वसुली होण्यासाठी बॅंकेकडून नोटिस कारखान्याला बजावण्यात आली आहे. परंतू ही थकबाकी भरण्याची मानसिकता नाही. कामगारांनी थकलेल्या वेतनासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.
या कामगारांना लवकरच सर्वच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ राजीनामे देणार आहे. असे सांगून थकबाकी वसुलीसाठी आता बॅंकेच्या कारवाईची वाट ते पाहत आहे. पण बॅंक सर्व परिस्थिती पाहून पुढचे पाऊल उचलणार असल्याचे कर्डिले म्हणाले.कामगारांचे वेतन देण्यास पैसे नाही, बॅंकेची थकबाकी भरण्यासही पैसे नाही. त्यामुळे आता बॅंकेने कारवाई करावी अशी त्यांची अपेक्षा असून एकदा बॅंकेने कारवाई केली की बॅंकेसह माझ्यावर ठपका ठेवायला ते मोकळे अशी त्यांची रणनिती आहे. हे ओळखून आज बॅंकेने खुलासा करण्याची भूमिका घेतली आहे. बॅंक सभासद व कामगारांचे हित पाहणार आहे. पण राजकीय फायदा संपल्यानंतर विखेंनी आपले अंग काढू घेण्याची घेतलेली भूमिका ही बॅंक अडचणीत आणणारी आहे. कारखान्याने पैसे भरले नाही तर बॅंकेला कायदेशीर कारवाई करावीच लागणार आहे. ही संधी ते साधून माझ्यासह बॅंकेची बदनामी करतील.
पण हे होवू नये म्हणून बॅंक शांत आहे. असे सांगून कर्डिले म्हणाले की, आज कारखाना बंद करण्याची गरज नव्हती. राहुरी तालुक्यातून आजही पाच ते सहा कारखाने ऊस घेवून जात आहे. त्याचा अर्थात कारखाना गळीत हंगाम पूर्ण करेल,इतका ऊस नक्कीच तालुक्यात होता. पण कारखाना चालू न करता तो बंद ठेवून जिल्हा बॅंकेवर ठपका ठेवण्याचा घाट विखेंकडून घातला जात असल्याचे ते म्हणाले.बॅंकेने नोटिस दिल्यानंतर अद्याप कारखान्याकडून उत्तर देण्यात आले नाही. किंवा चर्चेची देखील तयारी त्यांनी ठेवली नाही. त्यामुळे त्यांना थकबाकी न भरताच राजकीय भांडवल करण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप करून कर्डिले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील पराभव व कारखान्यावरील कारवाई याचा कोणताही अर्थअर्थी संबंध नाही. बॅंक कायदेशीरपणे कारवाई करेल. हप्ते ठरवून देतांना बॅंकेने अटी व शर्ती टाकल्या आहेत. त्याचा भंग कारखान्याकडून होणार असेल तर कारवाई होणारच.
कर्डिले स्वतःच सक्षम आहे
डॉ. तनपुरे कारखान्याला विखे म्हणून कोणतीही मदत करण्यात आली नाही. केवळ सभासद व कामगारांच्या हिताचा विचार करून ही मदत झाली. त्यांना राजकीय फायदा झाला नाही हे सर्वांना माहित आहे. परंतु कर्डिलेंनी राजकीय फायदासाठी नाही. मी कारखान्याला मदत केली म्हणजे मी आमदार होईल असा राजकीय फायदा मी पाहिला नाही. राजकीय आखाड्यात त्यासाठी कर्डिले स्वतःच सक्षम आहे असे कर्डिले म्हणाले.