नवी दिल्ली – केंद्र सरकारतर्फे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमार्फत देशातील 230 जणांना व्हीआयपी म्हणजे महत्वाच्या व्यक्तींसाठीची सुरक्षा पुरवली जात आहे अशी माहिती केंद्र सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली. गृहविभागातर्फे एका लेखी उत्तरात सांगण्यात आले की, या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाची माहिती देता येत नाही. ते म्हणाले की विविध सरकारी यंत्रणा आणि विविध राज्य सरकारे या प्रक्रियेत सामिल असल्याने त्याचा एकत्रित खर्च सांगता येणार नाही.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून ज्या व्यक्तींना धोका संभवतो अशा व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते आणि ठराविक कालावधीनंतर त्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर ही सुरक्षा कायम ठेवायची, वाढवायची की कमी करायची याचा निर्णय घेतला जातो असे सरकारकडून सांगण्यात आले. त्यांच्या सुरक्षेवर होणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असतो असेही त्यांनी नमूद केले.
झेडप्लस, झेड, वायप्लस आणि वाय या वर्गवारीनुसार ही सुरक्षा पुरवली जाते. त्यात झेडप्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी 22 ते 30 कमांडो तैनात केले जातात. झेड कॅटेगीरीसाठी 15 ते 18 कमांडो तैनात केले जातात, वाय प्लस साठी 8 ते 12 आणि वाय कॅटेगीरीसाठी 6 ते 10 कमांडो तैनात केले जातात असे यावेळी सांगण्यात आले.