मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे विधिमंडळ अधिवेशनातही तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला आहे.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा भाजपाने लावून धरला असून, विधिमंडळात सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. याच प्रकरणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली आहे. “मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध! प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत… जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प!,” असा इशारा पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर काही सवालही पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण…. फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का? मनसुख हिरेनच्या पत्नीचा सचिन वाझेवर का संशय?, मनसुख हिरेनची हत्या झाल्याचे त्यांच्या पत्नीला का वाटते?, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
मनसुख यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडीत, रेती बंदर येथे आढळला होता. मनसुख यांच्या चेहेऱ्यावर पाच ते सहा हातरुमालांचा गठ्ठा आढळला. तसेच शवचिकित्सेत मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे विमला यांचा जबाब आणि शवचिकित्सेतून पुढे आलेल्या निरीक्षणांआधारे एटीएसने रविवारी रात्री अनोळखी व्यक्तीविरोधात हत्या, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केलेला आहे.