संतोष वळसे-पाटील
मंचर -पावसाळा सुरू झाला की प्रत्येक श्वास अखेरचाच श्वास आहे, असे वाटण्यासारख्या भयावह स्थितीत आंबेगाव तालुक्यातील पाच गावांमधील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. माळीणची दुर्घटना घडून सात वर्ष उलटली तरी या गावाच्या पुनर्वसनाकडे लक्ष देण्यास ढिम्म प्रशासनाला वेळ नाही. लालफितीच्या या ओंगळवाण्या विलंबात भीतीखाली जीवन कंठण्यावाचून ग्रामस्थांपुढे पर्याय राहिला नाही.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील दरडप्रवण क्षेत्रातील पाच गावे धोकादायक असल्याचे सहा वर्षापूर्वी माळीणच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने जाहीर केले. भीमाशंकर आणि आहुपे परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळत आहेत. आदिवासी भागातील माळीणनंतर धोकादायक असणाऱ्या पाच गावांमध्ये नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. तळीयेमध्ये घडलेल्या घटनेने या ग्रामस्थांच्या भीतीला पारावार राहिला नाही.
दरडप्रवण क्षेत्रातील पाच गावांचे पुनर्वसन लवकर करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटून या कामाची तड लावणार आहे. ग्रामस्थांना कायम स्वरूपी पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– संजय गवारी,सभापती, पंचायत समिती