नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीत बिहार राज्याचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट मिळाले नाही. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला आहे.
देशमुख म्हणाले, ‘कदाचित आम्ही विचारलेल्या प्रश्नाला घाबरून जाऊन भाजपाने पांडे यांनी तिकीट दिले नसावे. आम्ही भाजप नेत्यांना प्रश्न विचारला होता की, ते गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करण्यास जाणार का? कदाचित याच प्रश्नाला भाजप घाबरला आणि निवडणुकीचे तिकीट पांडेंना दिले नाही.’
मात्र, कोणाला तिकीट द्यावे आणि कोणाला नाही, ही पक्षाची अंतर्गत बाब असल्याची पुष्टीही देशमुख यांनी दिली.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणारे वक्तव्ये केले होते. त्यांनतर पांडे यांनी डीजीपी पदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार यांच्याशी हात मिळवला होता. मात्र त्यांना ज्या दोन ठिकाणचे तिकीट हवे होते त्या जागा भाजपाकडे गेल्याने पांडे यांची पंचाईत झाली. भाजपाच्या दोन बड्या नेत्यांचा पांडे यांना विरोध असल्याचेही बोलले जात आहे.
पांडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत महाराष्ट्राचे गृहमंत्र्यानी भाजपला चांगलेच कात्रीत पकडले होते. एका अर्थाने पांडे यांचा महाराष्ट्र सरकारकडून पराभव झाल्याचे बोलले जात आहे.