नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्यासाठी नोटबंदी एकमेव कारण असल्याचे सांगत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनच्या भारतातील घुसखोरीवरून ओवैसींनी चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून बसले आहेत, हे खरे देशभक्त या नात्याने भागवत यांनी मान्य करावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी आरएसएसची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावं, असे आव्हान त्यांनी भागवतांना दिले.
“मोहन भागवत म्हणतात की कोणत्याच गोष्टीसाठी आपण चीनवर विसंबून राहायला नको. मग भारतात नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था कोणी उद्ध्वस्त केली?, देशातील आर्थिक स्थितीला कोण जबाबदार आहे?, केवळ आणि केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. करोना महामारीत मोदी सरकारनं जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल झालंय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत भागवत यांचं विधान बोगस आहे,” अशी टीका ओवैसींनी केली.
चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत ही वास्तविकता आहे आणि ती मोहन भागवतांना दिसत नाही. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत असल्याचे ओवैसी म्हणाले.
दरम्यान, “देशाने आत्मनिर्भर व्हायला हवं. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू. आपण किती कमवतो यावर आपलं राहणीमान निर्भर नसावं तर, आपण किती कर भरतोय यावर निर्भर असावं,” असं मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले होते.