मुंबई – राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. ही लाट भीषण असून वैद्यकीय सुविधा अभावी अनेकांचा जीव जात आहे. यावरून विरोधी पक्षाकडून राजकारण करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजकारण न करण्याची विनंती करण्यात येत आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रेमडीसिव्हीरच्या वितरणावरून पोलीस स्टेशनमध्ये घातलेला गोंधळ सर्वश्रूत आहे. कृतीवर माजी सनदी अधिकारी जे. एफ. रिबेरो यांनी नाराजी व्यक्त करताना फडणवीसांना फटकारलं आहे.
इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात रिबेरो म्हणतात, फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. पण, पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या इर्षेने त्यांचा संयम आणि तोल गेला आहे. त्यातून ते नको ते धोके पत्करत आहेत. सचिन वाझे प्रकरण त्यांनी मुळापासून एक्स्पोज केले, तर मला आनंद होईल. कारण, त्यामुळे पोलीस आणि राजकारण्यांचे भ्रष्ट नेक्सस उजेडात येईल.
रिबेरो पुढे म्हणाले, फडणवीसांनी करोनावरील औषधांच्या तुटवड्याचे अशा पद्धतीने राजकारण करणे – पोलीस स्टेशनला जाऊन नको तो प्रमाद करणे माजी मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. त्यांनी त्यासाठी पोलिसांची माफी मागायला हवी. देवेंद्र जे करताहेत, ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही आणि, त्यांच्या स्वतःच्याही फायद्याचे नाही. द्रुतगती मार्गावरची ही स्वतःची घसरगुंडी देवेंद्र फडणवीसांनी रोखायला हवी, असं आवाहनही रिबेरो यांनी केलं आहे.
सध्या भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जाताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आतादेखील भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. त्यामुळे रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असा इशाराही रिबेरो यांनी दिला.
देशमुखांवरील सीबीआय छाप्यावर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांची जोरदार टीका