मुंबई : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ लोकप्रिय मालिके मध्ये ‘रावणा’ची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. अरविंद त्रिवेदी ८२ वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री मुंबईत अखेरचा श्वास घेतला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्याच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, “अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. गेल्या 3 वर्षांपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. अशातच दोन ते तीन वेळा त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं.
साधारणतः महिन्याभरापूर्वी ते उपचारानंतर घरी परतले होते. मंगळवारी रात्री 9 ते 9.30 दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.” तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “अरविंद त्रिवेदी यांच्यावर सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.”
Bahut dukhad Samachar hai ki Hamare Sabke Pyare Arvind bhai (Ravan of Ramayan) Ab Hamare bich Nahin Rahe😥 Bhagwan Unki Atma ko Shanti De…I am speechless I lost father figure, my guide, well wisher & gentleman … 🙏😥 pic.twitter.com/RtB1SgGNMh
— Sunil lahri (@LahriSunil) October 6, 2021
रामानंद सागर कृत ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. ‘रामायण’मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल.
रामायण मालिकेनंतर अरविंद त्रिवेदी यांनी ‘विक्रम और बेताल’ या हिंदी मालिकेतही काम केले होते. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन विश्वातील अनेक चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. मात्र आजही त्यांना रामायण मालिकेत त्यांनी साकारलेल्या रावणाच्या भूमिकेमुळं ओळखलं जातं. त्यांनी 300 हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून काम केलं आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रामायणातील भूमिकेच्या यशानंतर त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीटही देण्यात आलं होतं. त्यांनी गुजरातच्या साबरकांठामधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि बहुमतानं विजयी देखील झाले. 1991 ते 1996 पर्यंत ते लोकसभेत खासदार होते. दरम्यान, अरविंद त्रिवेदी यांच्या बंधू उपेंद्र त्रिवेदीही गुजराती रंगमंच आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते.