नवी दिल्ली – जी ठिकाणं कोविडचे हाॅटस्पाॅट बनू शकतात अशा बाजारपेठांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा अधिकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे मागितला आहे. तसेच लग्न समारंभासाठी 200 लोक उपस्थित राहण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
ऑनलाईन माध्यमांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारने उपराज्यपालांना 200 च्या ऐवजी केवळ 50 लोकांना लग्नाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.
दिल्ली सरकार तसेच केंद्र सरकार राज्यातील कोरोनाची परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जी ठिकाणं कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनू शकतात अशा बाजारपेठांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचे अधिकार मिळवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवत आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.
या अत्यंत कठीण काळात दिल्लीकरांना मदत केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आणि दिल्लीकरांना मास्क घालण्याची व सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची विनंती केली.
दिल्लीत 28 ऑक्टोबरपासून कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. सध्या दररोज 7 ते 8 हजार रूग्ण वाढत आहेत. तसेच गेल्या पाच महिन्यात बुधवारी सर्वाधिक 104 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.