नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावललं जात असल्याच्या मोदींच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते एका सभेत बोलत होते. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी हे आरोप केले आहेत. तसेच “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला”. उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी पंतप्रधान पक्षातील वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचे म्हटले आहे. “तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे,” असं यावेळी ते म्हणाले.
@udhaystalin ji please do not use my Mother's memory for your poll propaganda! Your statements are false! PM @Narendramodi ji bestowed utmost respect and honour on my Mother. In our darkest hour PM and Party stood by us rock solid! Your statement has hurt us @mkstalin @BJP4India
— Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) April 1, 2021
यादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिले आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करु नये असे त्यांनी म्हटले आहे. “उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचं वक्तव्य चुकीचं आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत”, असे ट्विट बांसुरी स्वराज यांनी केले आहे.
.@Udhaystalin ji, I know there is election pressure – but I won't stay silent when you lie & disrespect my father's memory.
Dad @arunjaitley & Shri @narendramodi ji shared a special bond that was beyond politics. I pray you are lucky enough to know such friendship…@BJP4India
— Sonali Jaitley Bakhshi (@sonalijaitley) April 1, 2021
अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते. ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते,” असे त्यांनी म्हटले आहे.
सुषमा स्वराज आणि अरुण जेटली मोदी सरकारमधील महत्वाचे नेते होते. त्यांच्याकडे महत्वाची खाती होती. अटबिहारी वाजपेयी सरकारचाही ते भाग होते. प्रकृतीच्या कारणास्तव दोघांनीही २०१९ लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. ६ ऑगस्ट २०१९ रोजी सुषमा स्वराज यांचं निधन झाले. तर अरुण जेटली यांनी २४ ऑगस्ट २०१९ ला अखेरचा श्वास घेतला.