सातारा – तरुण पिढीला ग्रामदैवत वाटावे, असे अरुण गोडबोले यांचे व्यक्तीमत्व असून विविध क्षेत्रांत काम करताना त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदण्यासारखेच आहे. सज्जनगडच्या पायथ्याशी त्यांनी उभारलेले समर्थं दर्शन केंद्र, आंबेनळी घाटातील दुर्घटनेत मदत करणाऱ्या गिर्यारोहकाच्या सत्कारासह त्यांना केलेली मदत व ज्येष्ठांना लेखनासाठी उद्युक्त करुन सुरु केली लेखन स्पर्धांही हे त्यांचे मोठे काम आहे.
अरुण गोडबोले यांनी आता समर्थ रामदासांचे चरित्र इंग्रजीत लिहून समर्थाना जगभर पोहोचवावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर यांनी येथे केले.
येथील ज्येष्ठ करसल्लागार, साहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृृत्वाने सातारचे नाव उज्वल करणारे अरुण गोडबोले यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन स्नेहमेळावा शाहू कलामंदिरात रविवारी झाला.
त्यावेळी दाभोळकर बोलत होते. कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द बासरीवादक पद्मविभूषण पं. हरीप्रसाद चौरासिया, कणेरी मठाचे काडसिध्देश्वर स्वामी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले होते. माणूस म्हणून जन्म मिळाला तरी अनेकजण माणसाचा जन्म जगत नाहीत.
आपणा सर्वावर संस्कार करणारे लोक आपल्यातील अवगुण दूर करण्याचे काम करतात. असेच सर्व क्षेत्रात झळकणारे अरुण गोडबोले अनेक मूर्तींचा संगम आहेत, असे काडसिध्देश्वर स्वामी यांनी सांगितले. गोडबोले यांचा लोकसंग्रह खरोखरच अजब आहे. त्याच्या शंभरीला मी जरुर येईन, असे पं. हरीप्रसाद चौरासिया यांनी सांगितले.
अरुण गोडबोले समाजात प्रकाश पाडणारे असे व्यक्तीमत्व आहेत, असे सांगत राजदत्त यांनी माणूस हा कसा असावा तर असा, त्यांच्या मनातील स्पंदने तरुण पिढीने स्विकारवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. अरुणरावांनी चित्रपटात संधी दिली. माझ्यासारख्या अनेकांना उभे करण्याचे काम त्यांनी केले, असे नंदकुमार पाटील यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अरुण गोडबोले म्हणाले, “”मला आणि माझ्या कुटुंबाला सातारकरांनी कायम प्रेम दिले. आईचे कष्टप्रिय जीवन आणि भाउकाकांची शिस्त यातून घरातील सर्व कामे शिकलो. मनातील कष्टाची लाज गेली. समाजसेवेत झोळी पुढे करताना काही वाटले नाही. करसल्लागाराची सेवा करताना लोकसंपर्कं वाढला, पाच चित्रपट काढले. लेखन सुरु केले.
आजवर 40 ते 50 पुस्तकांचे लेखक अणि 175 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशक म्हणून काम केले. जीवनात चाकोरी आणि नितिमत्ता कधीच सोडली नाही आणि दुसऱ्याला त्रास ही कधी दिला नाही. घरातील उदंड माया, भावंडांचे प्रेम आणि पत्नीची अनमोल साथ मिळाल्याने मी या सर्वांच्या ऋणातुन कधीच मुक्त होऊ शकत नाही.” अरुण गोडबोले सर्व क्षेत्रांत चमकले. त्यांचा लोकसंग्रह अफाटच आहे. त्यांचा शंभरावा वाढदिवस येथेच साजरा व्हावा, अशी अपेक्षा शिवाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.
प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अच्युत गोडबोले यांनी आभार मानले.
कार्यक्रमास समर्थ सेवा मडळाचे योगेशबुवा रामदासी, रमेशबुवा शेंबेकर, प्राचार्यं रमणलाल शहा, ऍड. डी. व्ही. देशपांडे, पी. एन. जोशी, सुभाषराव जोशी, अमरसिंह पाटणकर, गायिका मंजुषा पाटील, गोविंदराव बेडेकर, प्राचार्यं पुरूषोत्तम शेठ, नंदकिशोर नावंधर, डॉ. सौ. गौरी ताम्हणकर, सारंग जोशी, प्रा. अविनाश लेवे, अशोक गोडबोले, उदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले, डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. सौ. अनुराधा गोडबोले, संजीवनी गोडबोले, प्रियंवदा गोडबोले यांचेसह संपूर्ण राज्यातून अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुमधूर बासरीवादन व “सर्वस्पर्शी’ चे प्रकाशन
सोहळ्याच्या पूर्वार्धात पं. हरीप्रसाद चोैरासिया यांच्या शिष्या वैष्णवी जोशी व ढाका (बांगला देश) येथील मुसर्रत जबीन रहमान यांचे सुमधूर बासरीवादन झाले. केरळमधील तबलावादक रत्नश्री अय्यर यांनी त्यांना तबला साथ केली. समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह मारुतीबुवा रामदासी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मधु नेने यांनी प्रास्ताविकात अरुण गोडबोले यांच्या विविध रूपांची ओळख करुन दिली. कंदी पेढ्यांचा हार, शाल, पुष्पगुच्छ देत पं. हरीप्रसाद चौरासिया यांनी गोडबोले यांचा सपत्नीक सत्कार केला. “सर्वस्पर्शी’ या लेखसंग्रहाचे आणि सौ. अनुपमा गोडबोले यांच्या “..तरीही चकोर अनन्य’ या आत्मकथनाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.