-शंकर दुपारगुडे
पुणे – विवाह सोहळा म्हणजे प्रत्येकांच्या जीवनातील आनंदाचा क्षण. भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारापैकी एक विवाह संस्कार म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्वणी असते. रंगीबेरंगी सजावट फुले, माळा, नातेवाईकांचा गोतावळा, लहान मुलांची किलबिल, मेंहदी, मेकअप, आकर्षक कपड्याचा बस्ता, सनई चौघडे आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, पाहुणचार, मानपान विविध पदार्थांच्या जेवणावळी अशी तीन ते चार दिवस भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणारा लग्न सोहळा असतो.
दरवर्षी सर्वत्र फेब्रुवारी महिन्यापासून ते मे महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत लग्नाचे शुभमुहूर्त मोठ्या प्रमाणात असतात. या काळात धूमधडाक्यात लग्न सराई सुरू असते. यावर्षी करोना संसर्गजन्य आजाराच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज प्रत्येकजण स्वताःच्या आरोग्याची सुरक्षितताः बाळगत आहे. राज्यासह देशात लॉकडाउन लागू असल्याने जमावबंदी आदेश शासनाने दिले आहेत.
सामुदायिक व गर्दीच्या सर्व कार्यक्रमांना परवानगी नसल्याने यावर्षीच्या लग्नसराईच्या काळ सॅनिटायझर चोळत तोंड बंद करून घरीच बसण्याची वेळ आली आहे. लग्नाचे बाशिंग बांधून घोड्यावर बसण्याचे स्वप्न पहाणारे नवरदेव आणि कलवऱ्यांच्या घोळक्यात नटूनथटून विवाह बंधनात अडकण्याचे स्वप्न पहाणाऱ्या नवरी मुलींना करोनामुळे तोंड न उघडता शांत बसण्याची वेळ आली.
नेहमीची लगबग, धामधुम, व-हाडी, वराती या सर्वांवर करोनामुळे विरजण घातले असून हळदीने हात पिवळे करण्या ऐवजी सॅनिटायझर लावून धुण्याची वेळ आली त्यामुळे दोनाचे चार नव्हे …तर सुरक्षित अंतर ठेवण्याचे दिवस यावर्षी अनेकांच्या नशिबी आले आहेत.
लग्नाची धामधूम म्हंटली की डोळ्यासमोर येते ते दोन जीवांचे मनोमिलन आणि त्यातुन नवीन नाती, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबध निर्माण होतात. नवा संसार थाटला जातो. घरात लग्न असल्यावर जेष्ठांपासून ते लहानग्या पर्यंत सगळी धावपळ सुरू असते प्रत्येक जण आनंदात असतो. आकर्षक मंगल कार्यालय, जेवणाचे विविध पदार्थ ठरवून नियोजन करणे, डीजे किंवा बँड ठरवणे, नवीन कपडे, वधू वरचा शृंगार, रुखवत ,मानपान, मेहंदी, मंत्राघोष करण्यासाठी ब्रम्हवृंद, हळदीचा दिवस व लग्नाचा दिवस अशी सर्वच धमाल असते. त्यात आप्तेष्ट,नातेवाईकांची,मित्रमंडळींच्या लुडबुड सुरू असते. रुसवे फुगवे व परत मनोमिलन हे तर आलेच. त्यातून ही मार्ग काढण्याची व आनंद शोधण्याची आपली ही संस्कृती आहे.
चालू वर्षी एप्रिल, मे महिन्यात लग्नाच्या सर्वाधिक तारखा होत्या त्यासाठी दोन चार महिने नियोजन करून मंगल कार्यालय बुकिंग करण्यात आली होती, जेवणाचे ठेकेदार ठरविणे आदी बाबी वधू – वर पित्याने करून ठेवल्या होत्या. मात्र या कोरोना आजाराने सर्वच गणित बिघडून टाकले. घरातून बाहेरच पडता येत नसल्याने या आंनदी क्षणाला पुढे ढकलण्यवाचून पर्याय राहिलेला नाही.
दरम्यान, विवाह सोहळा संस्कारातून समाजातील अनेकांच्या हाताला रोजगार मिळतो. करोनामुळे लग्न सोहळे होत नसल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. लग्न सोहळ्यावर अनेकांचे जीवनमान अवलंबून असते. फोटो ग्राफर, केटरींग, मंडप, लाऊडस्पिकर, मेकअप, कापड दुकानदार, सोनार, डिजे, बॅन्ड भाजे, सनई चौघडा, घोडेवाले, मनोरंजन कार्यक्रम करणारे, निवेदक व या सर्वांना कामात मदत करणारे मजूर अशा अनेकांचे कमाईचे मनसुबे या करोनाने उधळून लावले आहेत.
अनेकांच्या वर्षभराची कमाईवर कोरोनाने वरवंटा फिरवला आहे.विवाह सोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक छोट्या मोठया उद्योग व्यवसायीकांच्या समस्या करोनाच्यामुळे निर्माण झाल्या आहेत. भविष्यत जरी हे सोहळे पार पडणार असतीले तरी लोकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित गडगडल्याने खर्चाच्याबाबत हात आखडता राहील हे मात्र निश्चित आहे.
करोना मुळे सर्व आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून अनेकांच्या वर बेरोजगारीची वेळ आली आहे .
सध्या ठरलेले लग्न सोहळे काहींनी पुढे ढकलले तर काहींनी मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने आटोपते घेतले तर काहींनी मंदिरात तर काहींनी पोलीसांच्या साक्षीने लग्न उरकुन नव्या जीवनाला सुरूवात केली आहे.
लाखो रूपयांची गुंतवणूक करून नव्याने मंगल कार्यालये थाटलेल्यांचे या वर्षी सर्वाधिक नुकसान झाले आहे तर काहींनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची सर्व आर्थीक बाजू कमकुवत झाली आहे. अनेकांनी वेगवेगळे सर्वप्रथम पाहिले होते त्या सर्वांचे स्वप्न करोनामुळे धुळीस मिळाले. जीव वाचला तर पुढच्या वर्षी लग्न करू या विचाराने काहींनी पुढच्या मुहुर्तावर लग्न करण्याचा निर्णय घेवून करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.