कोरोनापासून बचावासाठी काय करायचं, व्याधीक्षमत्वाचे महत्व, त्यासाठी आपला आहार-विहार उत्तम राखण्याबाबतच्या सूचना इ. आजवर आपल्यासमोर लेख, लाईव्ह इ. मार्फत ठेवल्या. यापुढेही आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा आणखी काही बाबी शेयर करेन. आज एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. तो म्हणजे कोविड होऊन आपण बरे झाल्यावर घेण्याच्या काळजीचा ! आता बरे झाल्यावर कसली काळजी घ्यायची? जगभरात पसरलेल्या या आजारातून सुटका मिळवली म्हणजे लढाई सर केलीच की! नक्कीच! बरं होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. पण ही लढाई सर केलीत आणि तहात हरलात तर? नाही कळलं? सांगतो समजावून.
कुठलीही व्याधी झाल्यावर त्यातून उपचार घेऊन बाहेर पडताना घडणारी महत्त्वाची घटना म्हणजे शरीराची झीज होणं. आयुर्वेद यालाचं ‘धातुक्षय’ असं म्हणतो. या घटनेमुळे शरीरातील वात वाढीला लागत असतो. वात वाढल्याने पुढे जाऊन काही त्रास होऊ शकतात. अनेक विकारांत हे त्रास दिसतात. आयुर्वेद अशा त्रासांबाबत सविस्तर वर्णन करतो. थोडक्यात एखाद्या व्याधीची दृश्यमान लक्षणं ठीक झाली म्हणजे शरीर पूर्ववत झालं; असं होतं नाही. त्याला काही वेळ द्यावा लागतो. आणि याकाळात काही काळजी घ्यावी लागते. नेहमीच्या पाहण्यातलं उदाहरण देतो, प्रसूती झाल्यावर बाळंतिणीला मालिश करणं, पौष्टिक आहार खायला देणं, बाळंत काढा, पोट बांधण्यास सांगणं इ. गोष्टी आवर्जून करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हे सारं का? तर शरीर पूर्ववत करण्यासाठी आणि झालेली झीज भरून काढण्यासाठीच. ज्या माता-भगिनींमध्ये हे उपाय केले जात नाहीत त्यांना पुढे अनंत आरोग्यविषयक समस्या भेडसावतात हा कित्येकींचा अनुभव असेल. यातील कित्येकजणी नंतर आयुर्वेदाचाचं मार्ग धरून निरोगीदेखील होतात. मग हीच काळजी आधीपासूनच घेतली तर?
कोविड बरा झाल्यावरही आपल्याला अशाच प्रकारची काळजी घ्यायची आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर पुढचा जो काळ आपल्याला होम क्वारंटिनमध्ये काढायचा आहे. त्यात आपल्याला रिचार्ज करा!
१. अशा रुग्णांना डिस्चार्ज मिळताच आयुर्वेदानुसार पहिला विचार हा अग्नी म्हणजेचं पचनशक्तीचा करावा लागेल. पंचकर्म केल्यावर जो ‘संसर्जन क्रम’ म्हणजेच हळूहळू पातळ ते घट्ट अन्न अशी जी वाटचाल आयुर्वेद सांगतो त्याचा विचार इथे करावा लागेल. आपल्या वैद्यांकडून आपलं डायट आखून घ्या.
२. आयुर्वेदानुसार श्वास, कास, हिक्का या व्याधींत दिलेला एक चिकित्सामंत्र म्हणजे प्रकुपित झालेल्या वाताचे शमन करण्यास प्राधान्य देणे. पूर्वकोविडीमध्येही (पूर्व = होऊन गेलेला, कोविडी = कोविडचा रुग्ण; आयुर्वेदीय परिभाषा रोचक आहे ना?) वातशमन करण्यास विचार करावा लागेल. ग्रंथांनी या शमनाचा उत्तम मार्ग ‘बृंहण’ सांगितला आहे. यासाठी वरील व्याधींच्या अधिकारात आलेल्या सिद्ध घृतांचा विचार वैद्यांना नक्कीच करता येईल. विशेषतः विचारणा स्नेहाच्या कल्पनांचा प्राधान्याने विचार करावा.
३. शोणितफेनप्रभवः फुप्फुसः। (सुश्रुत शा ४/२५) हे सूत्र अत्यंत महत्वाचे आहे. कोविडच्या तीव्र अवस्थेतील घडामोडी पाहतादेखील ते महत्वाचे आहे. तसेच डिस्चार्ज मिळाल्यावरही. या रोगात फुफ्फुसांची शक्ती क्षीण होते हे वेगळे सांगायला नकोच. यासाठी डिस्चार्ज दिलेल्या कित्येक रुग्णांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला जातो. मात्र केवळ हाच उपाय आहे का? नक्कीच नाही! इथे आपले वैद्य बाह्य स्नेहनाचा विचार करू शकतात. क्षीरबला ते महामाष….बरेच पर्याय आहेत वैद्यांकडे. यासहच प्राणायाम उत्तम मदत करेल.
४. धातूंची झीज भरून काढण्यासाठी सध्या सुपरिचित झालेली ‘रसायने’ वापरता येतील. इथेही आपल्या आवश्यकतेनुसार च्यवनप्राश ते द्राक्षा वा वासावलेह इ. रसायने आपल्या आवश्यकतेनुसार आपले वैद्य देऊ शकतील. याशिवाय ज्यांना co-morbidity म्हणजे डायबेटीस इ. आहेत त्यांना ती गरजदेखील लक्षात घेऊन रसायने देता येतील. आपण या त्रासांसाठी एरव्ही पाश्चात्य औषधे घेत असाल तरी वैद्यांच्या सल्ल्याने ही रसायने घेण्यास हरकत नाही.
५. आपल्याला आठवत असेल; अगदी सुरुवातीच्या काळापासूनच आमच्यासारखे वैद्य आयुर्वेदातील ‘विषचिकित्सा’चा विचार करण्यास प्राधान्य देत होते. स्वतः व्याधी आणि नंतर त्यावर दिलेल्या पाश्चात्य वैद्यकातील उपचारांच्या साईड इफेक्टस नंतर आलेले धातुवैगुण्य याचा विचार करता आयुर्वेदात आलेल्या विविध अगद वा विषनाशक उपायांचा विचार करून आपले वैद्य उपचार देऊ शकतात.
आधीही उल्लेख केल्याप्रमाणे; कोविड होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहेच. आम्ही वैद्य व्याधीक्षमत्व याबाबतही बोलत-लिहीत आहोत, चिकित्सालयांत उपलब्ध आहोत. कोविडींवर आयुर्वेदीय उपचार देण्यास शासनाने सकारात्मक विचार करावा याकरता सतत आग्रही आहोत-असू. पण ‘तांत्रिकदृष्ट्या’ कोविड बरा झाल्यावरही आपली गाडी मार्गावर आणण्यासाठी आयुर्वेदाचा सल्ला घेण्यास विसरू नका. जेमतेम दीड महिन्याचा आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने घेतलेला हा ‘रसायन’ वा अपुनरुद्भव चिकित्सेचा आयुर्वेदीय ‘बूस्टर’ कोर्स आपल्याला मोलाचा ठरू शकतो. डिस्चार्ज मिळून परतलेल्या कोविड रुग्णाच्या घरातील कुटूंबियांबाबतीतही व्याधीक्षमत्व आणि रसायन चिकित्सेचा विचार करणे आवश्यक आहे. रुग्ण बरे करणे इतकेच आयुर्वेदाचे ध्येय नसते; ते बरेच राहावे यासाठी आम्ही वैद्य प्रयत्नरत असतो.
– वैद्य परीक्षित शेवडे, एम.डी. (आयुर्वेद)