जागतिक एड्स दिनविशेष : 17 हजार रुग्णांची नोंद
समुपदेशन करून औषधोपचार
– प्रकाश गायकर
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये 2008 साली एआरटी सेंटरची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या केंद्रामध्ये 17 हजार 280 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बजाज कंपनी व वायसीएम यांच्या वतीने हे केंद्र चालवले जाते. अनेक एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरत आहे. करोनाच्या काळातही या विभागाच्या वतीने एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी तेवढ्याच जिद्दीने काम सुरू आहे.
वीस वर्षांपूर्वी एड्स या आजाराविषयी भयंकर चित्र दिसत असताना एड्सवरची औषधे बाजारामध्ये उपलब्ध झाली. मात्र ती महाग असल्याने खूपच कमी रुग्णांना त्याचा फायदा घेता येत होता. मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर चालली आहे, हे ओळखून शासनाने वेळीच पाऊले उचलली. एड्सच्या रुग्णांना औषधांची सहज उपलब्धता व्हावी व या रोगाचा समूळ नायनाट करता यावा यासाठी ठिकठिकाणी एआरटी सेंटर स्थापन करण्यात आले.
शहरामध्ये वायसीएम रुग्णालयात 2008 मध्ये एआरटी सेंटर स्थापन झाले. या केंद्रामध्ये दर महिन्यांला 6 हजार रुग्ण उपचार घेतात. येथे रुग्ण आल्यानंतर सरकारी नियमानुसार त्याची एचआयव्ही चाचणी केली जाते. आजाराचे निदान झाले, तर त्या रुग्णाची केंद्रामध्ये नोंद केली जाते. त्यानंतर त्याची सीडीफोर चाचणी केली जाते. कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या सीडीफोर लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते.
एचआयव्हीचा विषाणू या सीडीफोर लिम्फोसाइट वरच हल्ला करत असल्याने रुग्ण आपली प्रतिकारक शक्ती गमावून बसतो. त्यामुळे कोणत्याही इतर जंतुसंसर्गाला तो बळी पडतो. एचआयव्हीसोबतच वेगवेगळे अन्य जंतू या रुग्णांच्या शरीरात विनाअडथळा प्रवेश करतात. त्यामुळे रुग्णाला इतरही आजार जडतात.
एड्सवरची औषधे ही बहुधा तीन औषधांचा एकत्र संच असतो. त्याला एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) असे म्हणतात. सकाळी एक आणि रात्री एक गोळी अशा पद्धतीने डोस दिला जातो. त्यासोबतच क्षय रोगाची, तसेच अन्य जंतूंच्या प्रतिबंधाची औषधेही दिली जातात.
या केंद्रामध्ये रुग्णाची काळजी, आधार आणि औषधोपचार अशा पद्धतीने उपचार केले जातात. शहरामध्ये उद्योगांचा झपाट्याने विस्तार होत असल्याने अनेक बाहेरून स्थलांतरित झालेल्या रुग्णांचीही केंद्रामध्ये नोंद आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी, डॉ. स्मीता रविंद्रन व डॉ. स्वाती शेलार काम पाहत आहेत.
योग्य उपचाराने सर्वसामान्य जीवन शक्य
रोगनिदान झाल्याबरोबर उपचार सुरू केले, नियमित तपासणी ठेवली आणि उपचारात सातत्य ठेवले तर अनेक पातळ्यांवर आश्चर्यकारक सुधारणा दिसून येते. सीडीफोर पेशी वाढतात त्यामुळे शरीरात जंतूंचा शिरकाव होत नाही. रोगाची लक्षणे कमी होतात. एकंदर आरोग्य सुधारते. आयुमर्यादा वाढते. रुग्ण जीवन जगू शकतो. सध्या देशात 10 वर्षांहून अधिक काळ सातत्याने उपचार घेऊन सर्वसामान्य जीवन जगणारे असंख्य रुग्ण आहेत.
एआरटी सेंटरमध्ये समुपदेशन करून उपचार व आहाराविषयी मार्गदर्शन केले जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने औषधोपचार घेतल्यास एड्स या आजारावर मात करणे शक्य आहे. करोनाच्या काळात विभागामध्ये नवीन रजिस्ट्रेशन झाले नाही. मात्र जे रुग्ण आहेत. त्यांचे उपचार आपण बंद केले नाहीत. एक खिडकी पद्धतीने आपण रुग्णांना गोळ्या-औषधे देत होतो. केंद्रातील अनेक रुग्ण योग्य औषधोपचारांने आपले दैनंदिन जीवन व्यवस्थित जगत आहेत. त्यासाठी उपचारात सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
– डॉ. नितीन मोकाशी, वैद्यकीय अधिकारी, वायसीएम.