श्री सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शाळेमध्ये रंगला प्रवेशोत्सव
वाघळवाडी – ढोल-ताशांचा गजर…सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची काढलेली मिरवणूक…प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्याचे वाटप… अशा अल्हादायक वातावरणात श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगार मुलांचा शनिवारी (दि. 7) शाळेमध्ये प्रवेशोत्सव रंगला. यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हे विद्यार्थ्यांसह बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आले, हे या प्रवेशोत्सवाचे आकर्षण ठरले.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्टस् मुंबई आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून “आशा’ प्रकल्पाच्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांत केलेल्या सर्वेक्षणात 6 ते 14 वयाची 609 मुले आढळली आहेत. यातील सोमेश्वर कारखाना तळावरील 94 मुलांना जिल्हा परिषद सोमेश्वर आणि सोमेश्वर विद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. याचा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला.
दरम्यान “आशा’ या इंग्रजी भाषेचे आणि “शिक्षण कोंडी’ या मराठी भाषा अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी विद्या परिषदेच्या संचालिका शोभा खंदारे, शिक्षणअधिकारी सुनिल कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणधिकारी राजेश क्षीरसागर, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक लक्ष्मण गोफणे डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, डायट प्राचार्या कमलादेवी आवटे, गटशिक्षणधिकारी संजय जाधव, गटशिक्षणधिकारी गजानन आडे, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक लक्ष्मण गोफणे आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान आयुक्त विशाल सोळंकी यांनी ऊसतोड कामगारांच्या तळावर जाऊन मुलांशी आणि कामगारांशी गप्पा मारल्या. तसेच अधिकारी आणि शिक्षक यांच्याशी चर्चासत्र पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख संतोष शेंडकर यांनी, प्रास्ताविक “टाटा ट्रस्टस्’चे कार्यक्रम अधिकारी ज. म. परेश यांनी तर सोमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. जगताप यांनी आभार मानले.
राज्यात 200 साखर कारखाने आहेत. 15 जिल्ह्यांतून जवळपास 10 लाख कामगारांचे स्थलांतर होते असते. त्यांच्यासोबत एक लाख शाळेतील मुले स्थलांतरीत होत असतात. या स्थलांतरामुळे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आदी प्रश्नही आहेत. त्यामुळे हे स्थलांतर कसे रोखता येईल, आणि सहा महिने सुविधा कशा मिळतील यासाठी काम करणार असून पुढिल काळात स्थलांतर होणार नाही. यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य