मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने महाराष्ट्रासह तब्बल १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेवर छापे टाकले होते. एनआयए आणि ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून, पीएफआयच्या सभासदांची धरपकड केली त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काहींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचाही प्रकार समोर आला आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
“PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही? भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला करोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच PFI चा फायदा होतो.” असे सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही?भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच PFI चा फायदा होतो https://t.co/kF5YtR5Bsb
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2022
तर “ UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती. पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का?” असे प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.
“महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली होती.