वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम
वाठार स्टेशनसह परिसराला अवकाळीचा तडाखा
सातारा – गत काही वर्षांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीपेक्षाही यावर्षी दुष्काळाची दाहकता प्रचंड तीव्र होती. विशेष म्हणजे मार्च महिन्यापासून सुरू झालेला कडक उन्हाळा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही तितकाच तीव्र होता. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या चार महिन्यांत एकही अवकाळी पाऊस झाला नसल्याने दुष्काळाचे संकट आणखीनच गडद झाले होते. बळीराजासह सर्वजण आकाशाकडे नजरा लावून कधी पाऊस पडणार याची प्रतीक्षा करत होता. बळीराजासह सर्वसामान्यांची सुरू असलेली पावसाची प्रतीक्षा अखेर रविवारी संपली. जिल्ह्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह वाजत गर्जत पावसाने आगमन केले आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
वाठार स्टेशन वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर भरपूर उष्णता होती, अगदी अंगाची लाही लाही होत होती, घामाच्या धारा लागत होत्या अशातच दुपारी 3 वा.सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि अचानक वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार स्वरूपाच्या सरी पडू लागल्या कमीतकमी 1 तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत होता. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडेसुद्धा कोलमडली. या अवकाळी झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.
संरक्षक भिंत कोसळली : रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील शानभाग विद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.