बाळू, मला साधं सांगायचं तरी. खरं तर, मी त्यांच्या जास्त सहवासात राहिलो होतो.’ “शांतीलाल, राहूनच गेलं बघ. खूप घाईत झालं प्रकाशन.’ काही वेळाने, “हॅलो रत्नाकर, मी बोलतोय. एवढ्या दिवसांनंतर आज पुस्तक हाती पडलं. वकील साहेबांविषयीच्या सगळ्यांच्या आठवणी वाचल्या. खूप छान वाटलं. पण तू तरी किमान मला सांगायला हवं होतंस.’ “शांतीलाल, राजनने मला फोन केला. बाबांच्या वर्षश्राद्धाला त्यांच्यावर एक पुस्तक काढायचे आहे म्हणून. बहुधा राजनकडे तुझा कॉन्टॅक्ट नंबर नसेल; पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. आम्हा सगळ्यांना माहितेय की, तुझं आणि भाऊंचं नातं किती घट्ट होतं.’ पुन्हा काही वेळाने बाबांनी मला एक नंबर लावायला सांगितला. मी फोन लावून दिला. “हॅलो, झालं का जेवण?’ पलीकडून आवाज आला. “अरे बाप रे! किती वर्षांनी आठवण आली शांतीलाल?’ रजू मावशी आणि बाबा बराच वेळ बोलत होते. तिलाही बाबांनी तोच प्रश्न केला. “मला कुणीच कसं बोललं नाही पुस्तकाविषयी? वकील साहेबांच्या आठवणीत मी कितीतरी लिहिलं असतं.’
वकील साहेब म्हणजेच प्रकाश धसे. बाबांचे जिवलग मित्र. संध्याकाळी मी घरी आलो. बाबा बाल्कनीत पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील वकील साहेबांच्या फोटोकडं एकटक पाहात उभे होते. मी त्यांना विचारलं. “मग, झालं का पुस्तक वाचून?’ ते आत येऊन सोफ्यावर बसले. “हो.’ त्यांचा आवाज जरा खोल गेल्यासारखा वाटत होता. “तुमची आणि काकांची कधीपासूनची मैत्री?’ बाबांनी कपाळावरचा चष्मा डोळ्यावर सरकवला आणि बोलू लागले. “सुभाष, माझा मित्र. सुभाषचे गाव आपल्या तांबाराजुरीपासून चार किलोमीटर. तळे-पिंपळगाव. तिथून तो शाळेला राजुरीला यायचा. माझे त्याच्या गावी घरी जाणे-येणे व्हायचे. प्रकाश हे सुभाषचे मोठे बंधू. त्यावेळेस ते वकिलीचे शिक्षण घेत होते. मी त्यांच्या घरी गेलो की, ते सगळ्यांना सांगायचे. हा आपल्या सुभाषचा मित्र बरं. सुरुवातीला घरातल्यांना वाटायचं, हा सुभाष कुणाला पण काय घरी घेऊन येतो कुणास ठाऊक. पण पुढे त्यांना माझी आणि मला त्या वाड्यातल्या लोकांची सवय झाली. मला कुठलंही काम करताना पाहून आपसूकच या लोकांची माझ्याशी जवळीक वाढली. मग, कुठे बंद पडलेल्या रेडिओला दुरुस्त करणं असो; नाहीतर विहिरीवरची मोटार. वकील साहेब मला त्यांच्याबरोबर तालुक्याला पाटोद्याला घेऊन जाऊ लागले. आम्ही पिंपळगावावरून दहा किलोमीटर पायी चालत जायचो. आणि पुढे झालं असं की, मी सुभाषपेक्षा त्यांच्याच सहवासात जास्त राहायला लागलो. तसं पाहायला गेलं तर आमच्या वयात बरेच अंतर होतं. पण ते आम्हाला कधीच जाणवलं नाही.’
खरं तर, बाबांचा स्वभाव संकुचित नाही. कुणाच्यातही पटकन मिसळून जाणारे. कुठच्याही विषयावर बोलताना ऐकण्यात आणि त्याविषयी काही ज्ञात असेल तर समोरच्याला सांगण्यात त्यांची कमालीची उत्सुकता असते. एखाद्याच्या स्वाधीन तेव्हाच होता येतं जेव्हा समोरच्या व्यक्तीशी एक नाळ जोडलेली असते आणि मैत्रीच्या नात्यापेक्षा घट्ट नाळ ती कुठली असणार! “वकील साहेबांना सतत बडबड लागायची. राजकारण, चित्रपट हे त्यांचे आवडते विषय. तेवढेच खुमासदार आणि मिश्किल. बोलता बोलता दहा किलोमीटरचा प्रवास कधी संपायचा कळूनच येत नव्हता.
एकेकाळी त्यांच्या वाड्यातून सोन्याचा धूर निघायचा. एवढं ते घराणं श्रीमंत. काळाच्या ओघात वाड्याला अवकळा आली. वकील साहेबांचा भक्कम आधार मिळाला आणि पुन्हा सारी सुखं दारी परतली. पाटोद्याला प्लॉट घेतला. नारळ माझ्याच हातून फोडला. वहिनीला सांगितलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला होता. किती दिवस पायी प्रवास करायचा म्हणून फटफटी घेतली. कधीकधी रात्रीचे बारा-एक वाजता आम्ही राजुरीला यायचो. गाव जवळ आलं की फटफटीचा आवाज ऐकून माई म्हणायची, आली बघ ही भुतं. ते मला आपल्या घरी थांबूच देत नसायचे. हं; माई बघितलं का शांतूचं तोंड? म्हणून मला पिंपळगावला मुक्कामी न्ह्यायचे.
सुरुवातीपासूनच निडर आणि कुणालाही न जुमानणाऱ्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या वकिली पेशात दिसू लागलं. अल्पावधीतच त्यांचं नाव झालं. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणं म्हणजे वकिली. पण हा माणूसच निराळा. खोटं अजिबात खपायचे नाही. त्यांनी उभ्या आयुष्यात प्रामाणिकपणा सोडला नाही. तुझा विश्वास बसणार नाही; पण या माणसाने चक्क तहसीलदाराचा हात धरावा! म्हणजे, तुम्ही आमच्या विरोधात निकाल देऊ शकत नाही हे नुसतं बोलणं वेगळं आणि कृतीतून ते करणं वेगळं. अभ्यास, स्वतःवरचा विश्वास आणि आतलं धाडस!
अवाक होऊन तहसीलदार पाहातच बसले. तिथपासून त्यांची एक छाप निर्माण झाली. कधी त्यांच्या विनोदबुद्धीने कोर्टातलं वातावरण हलकं-फुलकं व्हायचं. जास्त हळवेपणा चांगला नाही; आयुष्यात मागे पडशील. मी लहान असताना बाबांच्या तोंडून बऱ्याच वेळा हे ऐकलं होतं. पण ते असे का बोलायचे, आज कळत होतं. आयुष्यात त्यांनी पैसा कमावला नाही; पण बिनरक्ताची नाती मात्र जोडली! वकील साहेबांविषयी ते भरभरून बोलत होते. आयुष्यातल्या त्या दोघांच्या प्रवासात दोन-चार पावलं सावली होऊन सोबत चालत असल्याचा भास मला होत होता…
अमोल भालेराव