मार्च महिना सुरू झाला की, किंचित उन्हाच्या झळा सुरू व्हायच्या. रात्री मात्र हवेत बराच गारठा असायचा. होळी झाली की थंडी कमी होई, असा निसर्गनियम होता. शेतातला गहू, करडा, हरभरा पिवळा पडून काढणीला यायचा. करड्याच्या फुलांचा गर्द दरवळ सगळ्या शेतात शिवारात घुमत राहायचा. चांदण्याने किंवा पहाटे लवकर गहू-करडा काढायला बायका शेतात जायच्या. कोण पैऱ्याने कोण मजुरीने.
गव्हाच्या ठरावीक काड देण्याच्या बोलीवर काढणी सुरू व्हायची. गहू काढणीला जाऊन एक एकजण एक-दोन पोती तरी हंगामात सहज गहू मिळवायचीच. शाळू काढलेला असायचा. कडब्याची बुचाड लावून ठेवलेली असायची; जेणेकरून उन्हाने कडब्यातला उरल्यासुरला ओलसरपणा जावा आणि चुकून पाऊस आला तर बुचाडावरून ओघळून जावा. चगाळा अजून गोळा करायचा असायचा. मधूनच एखादी वावटळ ज्वारीचा पाचोळा हवेत उडवून लावायची. सगळ्या शेतातून वाळलेला पाला तरंगत राहायचा. तूर काढून पेंड्या बडवायला खळ्यात पडायच्या. कुणी कुणी बडवून भुस्काट खोपीत नीट झाकून ठेवलेलं असायचं. आगाप पेरणीवाल्यांचे हरभरे, गहू, करडे उफणीला वाऱ्याच्या धारेला लागलेले असायचे.
मोकळ्या शेतात परड्यात बारीक चगाळ, खराब भुस्काट, शेंगाची फोलपटे खाली लावून होळीसाठी शेणकुट लावायला सुरुवात व्हायची. वर्षभराची जळणाच्या तजवीजिला सुरुवात व्हायची. वाळलेली शेणकुटे दररोज आवश्यक तेवढी घेऊन बाकीची शेणकुट हुडव्यासाठी राखून ठेवली जायची.
दहावी-बारावीची परीक्षा दाराशी आलेली असायची; कुणी शेतावरील आंब्याच्या, कुणी करंजाच्या तर कुणी बांधावरील लिंबाच्या झाडाखाली घोकंपट्टी सुरू केलेली असायची. चिंचेचा सगळा पाला झडून गाभूळलेल्या, विटकरी रंगांच्या चिंचेच्या आकड्यांनी झाड लवलवत असायचं. वाऱ्याच्या एखाद्या झुळुकीने पिकलेली आंबट गोड चिंच टूपुकदिशी खाली पडायची. जिथं कुठं चिंचा झाडत असतील तिथं चिंचेसाठी गर्दी करायचो. टपटप चिंचेचा सडा पडताना किती चिंचा घेऊ न किती खाऊ! असं मन हरकून जायचं.
आमची शाळा सकाळच्या सत्रात सुरू व्हायची. शाळा सकाळी सुरू झाली की आता लवकरच परीक्षा होणार आणि सुट्टी मिळणार याचा आभाळभर आनंद असायचा. सकाळी शाळेला जाताना आसपास अंगणात उन्हात वेताच्या थाळ्या, स्टीलची ताटे तेल लावून ठेवलेली असायची. मार्चनंतर येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या सणाच्या गुढी पाडव्याच्या तयारीला बायका लागायच्या. शेवया चाळायला बुट्टीच्या ताटांची आजूबाजूला ज्यांच्याकडे असतील तिथून मागणी सुरू व्हायची. शाळेला जाताना कुणाच्या अंगणात अशी ताटे मांडलेली असली की कधी एकदा शाळा सुटते अन् शेवया चाळतोय! असे व्हायचे. शाळेतून आलो की दप्तर टाकून पहिल्यांदा जिथं शेवया करायला चालू आहे तिथं जायचो. तेही आम्हा मुलींची वाटच बघत असायचे. बायका शेवया वळायला बसायच्या आणि आम्ही चाळायला.
मध्यम आकाराच्या एकसारख्या शेवया पाटाच्या दोन्ही बाजूनी एकसारख्या धावणे ही वळणारीची खासियत असायची; त्यासाठी कणकेचा गोळा व्यवस्थित हातावर तिंबून तिंबून घ्यावा लागायचा. मग तो गोळा दोन्ही हाताच्या खोळंत धरून कडेने किंचित दाब देत गोळा अलगद पाटावर घरंगळवत शेवया खाली सोडाव्या लागत. कणिक थोडी घट्ट झाली किंवा पातळ झाली तर गोळा अलवार पाटावर घरंगळायचा नाही; यासाठी काळजीपूर्वक नाजूकपणे कणिक तिंबावी लागायची. खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही, अशा मध्यम आकाराच्या शेवया सरसर पाटाखाली धावू लागल्या की चाळणारीची त्रेधातिरपीट उडायची. कसे पण ओढून ताणून चाळायचे नसते, त्याचाही आखीव रेखीवपणा ठरलेला असतो. गोल गोल एकसारखे बारीक वेढे घालत घालत ताट भरायचे, मधेच जर कणकेचा छोटा गोळा आला किंवा जड शेव उतरली तर ती तोडायची न वर पाटावर घरंगळत सोडायची.
वळणारीच्या गोळ्यात ती आपोआप मिसळून जायची. अशा तऱ्हेने चाळलेल्या शेवया कुठं दाट कुठं पातळ असे व्हायला नको किंवा एकदम दाट, एकदम पातळही व्हायला नको अन्यथा शेवया शिजताना गिचका होतो हे एक कसब होते. अशा पद्धतीने मन लावून एकसारखे रेखीवपणे ताट भरले की शेव तोडून दुसरे ताट लगेच खाली ठेवायचे; अशा सुंदर शेवया चाळणारीला सगळीकडेच डिमांड असायचे. बऱ्याचदा एखादी चाळणारी अशी बहाद्दरीन असायची की दोन पाटाच्या मध्ये बसून दोन्हीकडील शेवया हातावर सावरून सरसर चाळून पटापट ताटे भरायची. भरलेले ताट उन्हाला लावायला वेगळेच माणूस असायचे- एखादी म्हातारी आजी किंवा चाळणे-वळणे यातलं काहीच न येणारी एखादी छोटी मुलगी ताट उन्हाला ठेवणे, दुसरे रिकामे ताट आणणे असली कामे करायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत असली कामे शिकून घ्यायचीच यासाठी दररोज घरोघरी जाऊन शेवया करायला मदत करायची. सगळ्या शेवया झाल्या की मग छोटासा गोळा घेऊन आम्ही शाळकरी मुली वळायची प्रॅक्टिस करायचो.
शेवया झाल्या की मग कुरडईची तयारी सुरू व्हायची. त्यासाठी गहू भिजत घालून चिक्की काढून एका सकाळी लवकर उठून चुलीवर चिक्की शिजत ठेवली जायची. अंगणात खाटेवर शुभ्र धोतर टाकून पांढऱ्या चकचकीत कुरडया पाडल्या जायच्या. कुणा घरी उपवर मुलीचे लग्न जुळवाजुळवी चालू असली तर ती माऊली मग बडमासाठी पिवळ्या, केशरी रंगाच्या कुरड्या त्यातच घालून रिकामी व्हायची, ऐनवेळी धावपळ नको म्हणून! कुरड्या करून झाल्या की खालची खरवड खायला मजा यायची. उरलेल्या चिकट पातेल्यात पाणी ओतून ठेवायचे. सगळं पीठ भिजून पाण्यात पडायचं मग जनावरांना ते पाणी पाजायचं-एकूण काय तर इतकासाही अन्नपदार्थ वाया जाऊ नये! एव्हाना तूर, हरभरा घरात येऊन दाखल व्हायची. तूर धुऊन घोळण्याने अडकण्या, पवड बाजूला काढला जायचा. स्वच्छ टपोरी तूर उन्ह खायची. हरभऱ्यातले उरलेसुरले घाटे, काटक्या काढून स्वच्छ केले जायचे. डाळीला लागणारे हरभरे बाजूला ठेवून बाकी ऊन खाऊन पोत्यात बसायचे.
आता वाळवलेल्या धान्याच्या वर्षभरासाठी डाळी पाडायचे काम सुरू व्हायचे. मूग, चवळी, उडीद, तूर, हरभरा, मटकी सर्व कडधान्यांच्या डाळी पाडून, चैताच्या उन्हाला लावल्या जायच्या, पाठडाळी सडून टरफल बाजूला करायची आणि तेल हळद लावून एक ऊन खाऊन डब्यात जाऊन बसायच्या. घरोघरी जाते, उखळ असायचे त्यामुळं दळणे, कांडणे घरीच असायचे. फोलपट, कळणा, डाळगा आणि डाळकण्या तुरीच्या व हरभऱ्याच्या डाळीचे असे बाय प्रोडक्ट्स पडायचे बाकी डाळीपासून कळणा आणि डाळगा आणि फोलपट असे तीनच बायप्रोडकट्स पडायचे. कळणा म्हणजे डाळ दळताना पडणारे बारीक पीठ व एकदम बारीक फोलांचा झालेला चुरा मिक्स असायचा. डाळगा म्हणजे डाळींचे बारीक तुकडे आणि डाळकण्या म्हणजे त्याहून मोठे तुकडे. फोलपटे जनावरांना खाद्य, तूर न हरभरा डाळींच्या मिक्स कळण्याचा झुणका किंवा कळण्याची भाकरी खूप चविष्ट लागायची.
डाळगा, डाळकण्या भरडून त्याच्या भरडीमध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर घालून शेंगुळ अप्रतिम लागायची. याच भरडीमध्ये लसूण, लाल तिखट, मीठ घालून सांडगे करायचे. ज्यावेळेस कालवणाला भाज्या मिळत नसत किंवा चवीत बदल म्हणून सांडग्यांचे कालवण किंवा सुक्का सांडगा करत. ज्यांनी सांडग्यांचे कालवण खाल्लेय, ते कधीच चव विसरणार नाहीत इतका चविष्ट असतो सांडगा! शिवाय मिक्स डाळी असल्याने तो पौष्टिक पण असतो. आता बाजारात मिळतात पण त्याला “त्या’ सांडग्यांची चव नाही.
डाळी करून झाल्या की मग गृहिणी पापडाकडे वळायची. पायली दोन पायलीचे पापड एकेका घरातून बनायचे. प्रत्येकाने आपापल्या घरातून पोळपाट लाटणं घेऊन जायचं. ओळीने गोलाकार बसून एक एक गोळी घेऊन पापड लाटून बाजूलाच सुकायला टाकायचे. साताठ जणींनी पाच पन्नास पापड लाटले की तासा दोन तासात शे-पाचशे पापड तयार व्हायचे. पापड वाळले की शेजारी पाजारी पाच पाच पापडांची देवाण-घेवाण व्हायची. चैताची चाहूल लागून झाडांना कोवळी पालवी फुटायची.
वेगवेगळ्या फुलांचे मोहोर आसमंतात दरवळत असायचे. पहाटेच्या मंद गारव्यात पक्षांचा मधुर किलबिलाट आणि निसर्गाने घेतलेले नवीन रूप चैतन्याची, आनंदाची पेरणी करायचे. पाडव्याला पाटीपूजन व्हायचे आणि नुकत्याच केलेल्या शेवया येळून गूळ, तूप दूध घालून पोटभर खायला मिळायच्या. वार्षिक परीक्षा सुरू असायची किंवा अंतिम टप्प्यात असायची. डवऱ्याकडून सासनकाठ्यांची आरती व पूजा दररोज केली जायची.
– सुचित्रा पवार