नवी दिल्ली : करोना रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले आरोग्यसेतू अॅप हे व्यक्तिगततेचा भंग करणारे असल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला आता माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर देत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळला असून हे अॅप सुरक्षित व उपयोगी असल्याचे म्हटले आहे. याअॅपमध्ये लोकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रसाद यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, नीती आयोग व काही खासगी संस्था यांनी एकत्र येऊन हे अॅप तयार केले आहे. करोना विरोधातील लढय़ात ते मोठी भूमिका पार पाडत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, आरोग्यसेतू अॅप हे नागरिकांवर टेहळणी करण्यासाठीची आधुनिक प्रणाली आहे. यातील माहिती खासगी संस्था गोळा करतात व त्यावर कुणाचीही देखरेख नाही. यातील लोकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित नाही. तंत्रज्ञान लोकांना सुरक्षित ठेवू शकते हे मान्य केले तरी त्यातून लोकांची माहिती त्यांच्या परवानगीविना गोळा केली जात आहे .
राहुल यांच्या आरोपाला उत्तर देताना प्रसाद यांनी सांगितले की, हे उपयोजन सुरक्षित असून त्यातील माहिती संकेतावलीबद्ध आहे. तुमच्या परिसरात जर करोना रुग्ण असेल तर त्याची माहिती हे अॅप डाऊनलोड केलेल्या व्यक्तीस मिळते व ती सावध होते. यातून एखाद्या करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळू शकते. इतर देशातही अशाच अॅपचा वापर चालू असून आरोग्यसेतूमधील माहिती मर्यादित आहे. ती ३० दिवस राहते जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर ४५ ते ६० दिवस राहते नंतर आपोआप नष्ट होते. हे अॅप तुम्ही मोबाइलवर डाऊनलोड करू शकता तसेच काढूनही टाकू शकता. मग त्याबाबत एवढा गदारोळ करण्याचे कारण काय.
फिचर फोनसाठी आम्ही आरोग्यसेतू आयव्हीआरएस हे अॅप तयार केले आहे त्यातही व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहते. आरोग्यसेतू अॅप हा करोनाला रोखण्यासाठीचा तंत्रज्ञान आविष्कार असून त्यातून सभोवताली करोनाबाधित आहे की नाही हे तर समजतेच पण महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक समजतात.