लंडन – व्यक्ती, गट, धर्म आणि समजाचा अपमानकारक उल्लेख, शिविगाळ किंवा अपमानकारक भाषा आणि आक्रमकपणा यासाठी इंग्लंडच्या प्रसारण नियामकांनी रिपब्लिक भारत या वृत्त वाहिनीला 20 हजार पाऊंडचा (अंदाजे 18 लाख रूपये) दंड ठोठावला. तसेच या चॅनेलला माफी प्रसारीत करण्याचे आदेश देण्यात आले.
अर्णब गोस्वामी यांच्या “पुछता है भारत’ या कार्यक्रमाच्या सहा सप्टेंबर 2019मधील कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी ही कारवाई करण्यात आली. भारताकडून चांद्रयान 22 हे चंद्रावर उपग्रह सोडण्याच्या मोहीमेबाबत चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात गोस्वामी आणि पाहुण्यांच्या चर्चेचा रोख भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांवर होता.
त्यात भारतीयांची अवकाश संशोधनात घेत असलेली भरारी, पाकिस्तानच्या तुलनेत भारताने या क्षेत्रात केलेली प्रगती आणि पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांत असणाऱ्या सहभागाच्या अनुषंगाने ही चर्चा झाली, असे नियामकांच्या निवेदनात म्हटले आहे.
या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून त्यातील अतिथींनी तुमचे शास्त्रज्ञ, डॉकटर्स, त्यांचे नेते, राजकारणी सारेच दहशतवादी आहेत. अगदी खेळाडूही दहशतवादी आहेत. तिथला प्रत्येक मुलगाही दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवाद्यांच्या समुदायाशी व्यवहार करत असता असे वक्तव्य केले. तर गोस्वामी पाकिस्तानला उद्देशून म्हणाले, आम्ही शास्त्रज्ञ तयार केले, तुम्ही दहशतवादी बनवले.
इंग्लंडमध्ये रिपब्लिक भारतच्या प्रक्षेपणाचे हक्क असणाऱ्या मिडिया नेटवर्क लिमिटेडवर निर्बंध लादण्यात आले. हा निर्णय प्रसारण नियामकांनी 24 फेब्रुवारीला घेतला. त्याचा दंड मंगळवारी ठोठावण्यात आला. त्यांच्या प्रसारणात द्वेषमुलक संहिता असतात तसेच त्यांचे कार्यक्रम फारच आक्रमक असतात, असे नियामकांनी म्हटले आहे.