मुंबई – रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब यांचे व्हॉट्स अप चॅट व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आक्रमक झाले आहेत.
अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून उघड झालेली माहिती अर्णब यांच्याकडे आली कुठून असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पोलिसांनी रिलीज केलेले गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स धक्कादायक आहे. देशाच्या सुरक्षेबाबतची संवेदनशील माहिती, घटना दुरुस्त्या आणि राजकीय नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांना कोणी पुरवली ? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
The voluminous transcript of Mr Goswami’s chats released by Mumbai Police is deeply disturbing. Who gave access to such sensitive information from national security to constitutional amendments and political appointments? #ArnabGate
— Prithviraj Chavan (@prithvrj) January 17, 2021
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने याची चौकशी करायला हवी. यासाठी समिती नेमावी. तसेच संरक्षणविषय संसदीय स्थायी समितीने हे प्रकरण प्राधान्याने आपल्याकडे घ्यावे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली ट्विटद्वारे केली आहे.
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटमध्ये पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडवलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. तसचे समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे.