पुणे : सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता “अग्निपथ’ योजनेतून साकार होणार आहे. अग्निपथमध्ये निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे तिन्ही सशस्त्र दलांत देशसेवेची संधी मिळणार आहे. तसेच यापुढे लष्कराची भरती प्रक्रिया “अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातूनच होणार असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी सांगितले.
“अग्निपथ’ योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी जाहीर केली. योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी दक्षिण मुख्यालयाने आयोजित पत्रकार परिषदेत वालिया बोलत होते. ब्रिगेडियर पंचनंदा यांनी “अग्निपथ’ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेची माहिती दिली. भरती झालेल्या तरुणांना “अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. येत्या 90 दिवसांत या पहिली तुकडी लष्करात भरती होईल. त्यानंतर त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल, तरुणांनी सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना विविध प्रमाणपत्र दिले जाणार असेही त्यांनी सांगितले.
“अग्निपथ’ योजनेची उद्दिष्टे
देशभरातील सर्व जिल्ह्यांमधून अग्निवीरांची भरती केली जाईल.
तरुण अग्निवीरांमुळे लष्करात उत्साह, चैतन्य निर्माण होणार
तरुणांमध्ये राष्ट्रवादाचा प्रसार होणार असून त्यांच्या चार वर्षांच्या लष्करी सेवेनंतर समाजाला कुशल मनुष्यबळ मिळणार
असे आहेत नियम
साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
भरती होणाऱ्यापैकी 25 टक्के तरुणांना चार वर्षांचा सेवा कालावधी संपल्यानंतर सेवेत कायम केले जाणार
भारतीय लष्कर होणार बळकट
अग्निपथ योजनेमुळे भारतीय लष्कर शारीरिकदृष्ट्या बळकट होणार आहे. यातून युवकांची भरती मोठ्या प्रमाणात होणार असल्याने जवानांचे सरासरी वय 32 वरून 26 होणार आहे, असा विश्वास लेफ्टनंट जनरल वालिया यांनी बुधवारी व्यक्त केला.