नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चीनला भारतीय लष्कराकडून ठाम आणि दृढपणे प्रत्युत्तर देणे सुरूच राहिल, असे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे. या भागातील लष्कराची संरक्षण सज्जता अत्युच्च पातळीवर कायम राहिल. या भागात दोन्ही सैन्य दलांमध्ये तुरळक प्रमाणात हालचाली सुरू असल्या तरी अद्याप धोका अजिबात कमी झालेला नाही, असेही लष्कर प्रमुखांनी म्हटले आहे. लष्कर दिनाच्या पूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीबरोबर चर्चेद्वारे वाटाघाटी अजूनही सुरू आहेत. मात्र तरिही भारतीय लष्कराने आपली संरक्षण सज्जता कायमच अत्युच्च पातळीवर ठेवली आहे, असे जनरल नरवणे म्हणाले.
चीनच्या सीमेबाबतच्या नवीन कायद्याच्या कोणत्याही दृश्य परिणामांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची प्रतिबद्धता कायमच आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात राहिली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला ठाम आणि दृढपणे प्रत्युत्तर देणे भारतीय लष्कराकडून सुरूच राहिल, असेही ते म्हणाले.
उत्तरेकडील सीमा भागातील विकास आणि पायाभूत सुविधांचा उल्लेखही जनरल नरवणे यांनी केला. हा विकास समग्र आणि सर्वसमावेशक अशा स्वरुपाचा आहे. सीमाभागातील हा विकास दुहेरी मार्गांनी कशाप्रकारे केला जाऊ शकेल, हे बघितले जाते आहे. सीमा भागातील जैसे थे स्थिती एकतर्फीपणे बदलण्याच्या प्रयत्नांना भारतीय लष्कराकडून चोख प्रतिसाद दिला जातो आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादाबाबत सुरू असलेल्या 14 व्या फेरीमध्ये गस्तीच्या ठिकाणांबाबतचा तिढा सोडवला जाण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. नागालॅन्डमध्ये 4 डिसेंबर रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेबद्दलचा चौकशी अहवाल 1-2 दिवसात येईल आणि त्याच्या आधारे योग्य कारवाईही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.